
दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । सातारा । केंद्र शासनाच्या पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन 2020 पासून जल जीवन मिशनमध्ये समाविष्ठ करुन पुर्नरचना करण्यात आली आहे.यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी (कार्यात्मक नळ जोडणी) या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. योजनेची आखणी पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येनुसार केली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सर्व घरांना कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा तसेच सार्वजनिक ठिकाणी (महाविद्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र) शुद्ध तसेच योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होणे, 50 टक्के केंद्र व 50 टक्के राज्य शासन वित्तीय आकृतीबंध, 10 टक्के लोकवर्गणी ग्रामपंचायतींना योजनांची देखभाल व दुरुस्ती, पुर्नजोडणी वैयक्तिक गावांच्या योजना व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश, पाणी पुरवठा उद्भवाच्या शाश्वतेसाठी आवश्यक उपाययोजना करणे जसे की बोअरवेल पुनर्भरण संरचना, छतावरील पावसाचे पाणी संकलन इत्यादी. योजना कार्यान्वीत झाल्यानंतर योजनेची मालकी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे पुढील देखभाल व दुरुस्तीसाठी राहणार आहे हे या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण 6 लाख 13 हजार 455 इतकी नळ कनेक्शन देणे अपेक्षित असून त्यापैकी 31 मार्च 2022 पर्यंत 4 लाख 75 हजार 617 नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. सन 2022-23 साठीचे नळकनेक्शन चे उद्दिष्ट 70 हजार 577 इतके घेण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद कडील 1 हजार 713 योजना असून 306 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर 1 हजार 158 योजनांची निविदा कार्यवाही सुरू आहे. 400 योजनांची कामे प्रगतीपथावर असून 168 योजनांचे सर्वेक्षण व प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच मान्यता दिलेल्या 513 योजनांची निविदा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेचे नेट मीटरिंग चे पहिल्या टप्प्यात 86 योजनांचे प्रस्ताव महाऊर्जा, पुणे विभागाकडे पाठवण्यात आले होते त्यापैकी 29 योजनांचे प्रस्ताव प्राथमिक स्वरूपात व्यवहार्य ठरविण्यात आले आहेत दुसऱ्या टप्प्यात 43 प्रस्ताव महाउर्जा विभागाकडे पाठवण्यात येत आहेत ही कामे विशिष्ट स्वरूपाची असल्याने उपअभियंता यांत्रिकी यांचेमार्फत जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे निविदा कार्यवाही करून राबविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तालुका भेटीमध्ये जल जीवन मिशन अंर्तगतच्या प्रगतीपथावरील / पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.