येरळा नदीवरील गणेशवाडी हद्दीतील बंधाऱ्यातून पाणी गळती

 पाणीटंचाई मुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप 


स्थैर्य, 16 मार्च, सातारा : सध्या येरळा नदीवरील वडूज हद्दीतील गणेशवाडी हद्दीतील बंधाऱ्यातून पाणी गळती होत आहे. बंधाऱ्यावरील वक्र दरवाजे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पाण्याचा साठा होत नसल्याचे पाणीटंचाई निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशवाडी हद्दीतील जिहे-कटापूर केटिवेअर बंधाऱ्याच्या भिंतींमधून तसेच तळभागातून सातत्याने पाणी झिरपत आहे. येथील वक्र दरवाजे पूर्णपणे बंद होत नसल्याने साठवलेले पाणी नियंत्रित ठेवणे कठीण झाले आहे. परिणामी पाण्याची पातळी टिकून राहत नाही. नदीपात्रातील पाणी वाया जात आहे. गणेशवाडी व परिसरातील शेतीसाठी हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा तसेच भाजीपाला पिके या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र गळती व वक्र दरवाज्यांच्या बिघाडामुळे पिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंधाऱ्यावरील वक्र दरवाज्यांची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. काही दरवाजे गंजलेले असून, काही ठिकाणी यांत्रिक बिघाड झाल्याने ते नीट उघड बंद होत नाहीत. याच कारणामुळे गळतीचे प्रमाण वाढले असून, बंधाऱ्याच्या संरचनेवरही अतिरिक्त ताण येत आहे.
गळती आणि दरवाज्यांच्या बिघाडामुळे केवळ शेतीच नव्हे तर, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून गळती थांबवावी, वक्र दरवाज्यांची दुरुस्ती किंवा आवश्यक असल्यास नवीन दरवाजे बसवावेत तसेच संपूर्ण बंधाऱ्याची मजबुतीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी गणेशवाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
“सध्या परिस्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र बंधाऱ्यात पाणी गळतीमुळे पाणी साचून राहत नाही. पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
 …अमोल साळुंखे, शेतकरी’

Back to top button
Don`t copy text!