विडणीच्या विकासाचे ‘सागर’: लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या दूरदृष्टीतून गावाचा ऐतिहासिक कायापालट


स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी, प्रसन्न रुद्रभटे : एखाद्या गावाचा विकास हा तिथल्या नेतृत्वाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फलटण तालुक्यातील ‘विडणी’ गाव होय. विडणी गावच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व म्हणून लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांचे नाव आज आदराने घेतले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात गावाने कात टाकली असून, विकासाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

हायटेक ग्रामपंचायत आणि पायाभूत सुविधांचे जाळे सागर अभंग यांनी सरपंच पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. गावातील रस्ते, आरोग्यासाठी ‘ओपन जिम’ आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त गटारे यांसारख्या पायाभूत सुविधा त्यांनी प्राधान्याने मार्गी लावल्या.

विशेष म्हणजे, नीरा उजवा कालव्यावर नव्याने बांधण्यात आलेला पूल हे त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण काम ठरले आहे. तसेच, नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, फलटण तालुक्यात इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही, असे ‘हायटेक ग्रामपंचायत कार्यालय’ सागर अभंग यांच्या संकल्पनेतून साकारले गेले आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजात गती आणि पारदर्शकता आली आहे.

वारकरी सेवेचा आदर्श विडणी हे गाव केवळ विकासातच नाही, तर आध्यात्मिक वारसा जपण्यातही अग्रेसर आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा विडणी येथे असतो. या काळात सागर अभंग आणि त्यांच्या टीमने वारकऱ्यांसाठी ज्या उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्या खरोखरच कौतुकास पात्र ठरल्या आहेत. वारकऱ्यांची सेवा हाच ईश्वर सेवा मानून त्यांनी केलेले नियोजन वाखाणण्याजoge आहे.

बंधूंची भक्कम साथ आणि ‘नियोजनबद्ध’ विकास

या विकासयज्ञात सागर अभंग यांना त्यांचे वरिष्ठ बंधू तथा अवर सचिव श्री. धीरज अभंग यांची मोलाची साथ लाभली आहे. धीरज अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सागर अभंग यांच्या अंमलबजावणीतून गावाचा विकास अत्यंत ‘नियोजनबद्ध’ रित्या झाला आहे. या दोघांच्या समन्वयामुळे विडणी गावाचे संपूर्ण चित्रच पालटून गेले आहे.

गावाच्या या प्रगतीत राजकीय नेतृत्वाचेही मोठे योगदान राहिले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे सततचे मार्गदर्शन व साथ सागर अभंग यांना लाभत आहे.

थोडक्यात सांगायचे तर, विकासकामांचा धडाका आणि दूरदृष्टी यामुळे सागर अभंग यांनी विडणी गावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


Back to top button
Don`t copy text!