दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत २०२५-२६ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांची खर्च करण्याची क्षमता वाढवणे, आर्थिक वाढीला चालना देणे आणि सर्वसमावेशक विकास प्रोत्साहित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे; असे मत ऑडिटर कौन्सिल अँड वेल फेअर असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष विवेक गायकवाड यांनी व्यक्त केले.
अर्थसंकल्पात वैयक्तिक उत्पन्न कर संरचनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन कर प्रणाली अंतर्गत, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. नवीन कर स्लॅबमध्ये खालील दर असतील :
-
० ते ४ लाख रुपये: नील
-
४ लाख ते ८ लाख रुपये: ५%
-
८ लाख ते १२ लाख रुपये: १०%
-
१२ लाख ते १६ लाख रुपये: १५%
-
१६ लाख ते २० लाख रुपये: २०%
-
२० लाख ते २४ लाख रुपये: २५%
-
२४ लाख रुपयांपेक्षा जास्त: ३०%
जुनी कर प्रणाली (Old Tax Regime) मध्ये कोणताही बदल नाही, परंतु नवीन कर प्रणाली (New Tax Regime) सुधारित करण्यात आली आहे ज्यामुळे अनेक करदात्यांसाठी कर भार कमी होणार आहे.
नवीन कर स्लॅबमुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात अधिक पैसे राहील, ज्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल. ऑडिटर कौन्सिल अँड वेल फेअर असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष विवेक गायकवाड म्हणाले, “या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या बचत आणि गृहखर्चात वाढ होईल.”
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळेल. सरकार महिला व बालविकास, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या अर्थसंकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मध्यमवर्गीयांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे आणि रोजगार निर्मिती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.