
स्थैर्य, नाशिक, दि.८: नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. तसेच त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउत म्हणाले, ‘वसंत गीते आणि सुनिल बागुल हे माझ्यासोबत आले आहे, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. आता दोन्ही नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकचा बालेकिल्ला आता आणखी भक्कम केला जाणार असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, नाशकात हा काही मास्टर प्लॅन नव्हता. प्रवाह बदलत आहे. पुढे काय बदल होणार आहे ते वसंत गीते आणि बागुल सांगतील. पण, आता शोभा मगर, प्रकाश डायमा हे सेनेत प्रवेश करणार आहे. अनेक भाजपचे पदाधिकारी, प्रमुख नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांना शिवसेनेसोबत काम करायचे आहे. या दोन्ही नेत्यांपाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत असे संजय राउत यांनी सांगितले.
बिहारच्या औरंगाबादच्या नामांतराचे काय? -राउत
औरंगाबादच्या विमानतळ नामकरणावर बोलताना संजय राउत यांनी सांगितले, की औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटने मंजूर करून केंद्राला पाठवला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. सोबतच महाराष्ट्रातील औरंगाबादच्या नामांतराची चर्चा असताना बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे अशी मागणी आहे. यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी. किमान समान कार्यक्रमावर लोकभावनेवर निर्णय घ्यायचा नाही, असा टोला देखील राउत यांनी लगावला.