‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा


 

स्थैर्य, सांगली, दि.२९: ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. यामुळे पवारांनाच भेटले पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला आहे. शरद पवार हेच सध्या सरकार चालवत आहे. यामुळे एखाद्या प्रश्नासाठी शरद पवारांनाच भेटले पाहिजे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी शरद पवारांची स्तुती केली होती. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर फिरतात त्यांचे कौतुक आहेच. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. वाढीव विज बिलांचा प्रश्न आणि दुध दर वाढीविषयीचे मुद्दे त्यांनी राज्यपालांकडे मांडले. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलेले नाही. त्यामुळे राज्यपालांनी राज यांना दिलेला सल्ला योग्यच आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!