
स्थैर्य,दि २०: भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) पर दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघारी जाण्याचा निर्णय झाला. याच मुद्द्यावर विविध चर्चा सुरू असताना भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी आपले एक्सपर्ट मत व्यक्त केले आहे.
मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, लडाखमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्डचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून भारत-चीनचे सैनिक माघारी गेल्याचा दुजोरा मिळाला. हाच टप्पा सर्वात महत्वाचा होता. कारण, हे तेच पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते. अशी परिस्थिती कधीही युद्धात बदलली असती. म्हणजेच या निमित्ताने युद्धाची परिस्थिती टळली. भारतासाठी ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे की आपण चिनी सैनिकांना आपण ठरवून दिलेल्या अटींवर परत पाठवले आहे.
1962 च्या मानसिकतेतून भारत बाहेर
कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही. चीनने काही कुरापत केल्यास भारताचे सैनिक त्या ठिकाणी अवघ्या 3 तासांत पुन्हा पोहोचू शकतील. पण, चीनच्या सैनिकांना त्याच ठिकाणी पुन्हा पोहोचण्यासाठी 12 तास लागतील. चीनला मागे लोटण्यात यशस्वी होऊन आपण पहिल्यांदाच 1962 च्या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत.
चीनने असे करण्याची ही पहिलीच वेळ
चीनने आपल्या लेखी अटी मान्य करून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने चिलखती वाहने, तोपखाने आणि टँक हटवल्या आहेत. मग, दोन्ही देशांचे सैनिक उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून मागे सरकले. आपले सैनिक कैलाश रेंजवरून मागे आले. आता पुन्हा दोन्ही लष्करांचे प्रतिनिधी बैठका घेतील. यामध्ये देपसांग, गोगरा आणि हॉट स्प्रिंगवरील पॅट्रोलिंग पॉइंट्सवर चर्चा होणार आहे.
गेल्या 10 महिन्यांत आपण चीनला हे दाखवून दिले की तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही. LAC वर सामान्य परिस्थिती खराब करण्याचा कट कुचकामी ठरला आहे. कैलाश रेंजवरून आपण मागे हटल्याने चीन काही कुरापती करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तरीही मी खात्रीने म्हणू शकतो की दक्षिण पँगाँगमध्ये आपली परिस्थिती मजबूत आहे.