संत नामदेवांच्या आध्यात्मिक विचाराचा वारसा महाराष्ट्रासह उत्तर भारतीयांनीही जोपासला : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । चंदीगड । संत नामदेव महाराज यांच्या जीवनात पंढरपूर आणि घुमान ही दोन्ही ठिकाणे महत्वाची आहेत. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतातही आपल्या आध्यात्मिक विचारांचा वारसा दिला . पंढरपूरप्रमाणे घुमाणलाही त्यांची समाधी आहे आणि त्यामध्ये कोठेही द्वैत नाही . भक्तांनी दोन्ही ठिकाणी भक्तिभावाने नतमस्तक व्हावे अशी भावना पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केली.

भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २३०० किलोमीटर रथ व सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत ११० सायकल यात्री व ४० नामदेव भक्त सहभागी झाले होते. या सायकल यात्रेचा समारोप सोमवारी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी प्रधान सचिव राखी गुप्ता भंडारी, निरंजन नाथ गुरू शांतीनाथ, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव विलास काटे , मनोज मांढरे ,पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे , राजेंद्रकृष्ण कापसे , राजेंद्र मारणे , घुमान येथील नामदेव दरबार कमिटीचे प्रमुख तरसेमसिंग बावा, सुनील गुरव, आदि उपस्थित होते.
पुरोहित म्हणाले, संत नामदेव महाराजांनी शांती , समता व बंधुताचा प्रचार केला . पंढरपूर येथे संत नामदेव यांचे कार्य महाराष्ट्रात सर्वदृर माहिती आहे मात्र त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार पंजाब प्रांतातही सुरू आहे. त्यानी दिलेल्या भक्ती आणि शांततेचा संदेश आदर्श समाज घडविण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे संत नामदेव महाराज महाराष्ट्राचे आहेत तसेच ते पंजाबचेही आहेत म्हणून दोन्ही राज्यातील भाविकांनी निष्ठा ठेऊन त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा. या सायकल वारीच्या निमित्ताने संत नामदेव यांचे अध्यात्मिक विचारांचा धागा दोन्ही राज्यांना जोडला आहे. संत नामदेवांनी भक्ती प्रेमाचा संदेश समाजाला दिला आहे. तोच संदेश या वारीच्या निमित्ताने दिला.
यावेळी प्रास्ताविक निरंजन नाथ गुरू शांतीनाथ यांनी केले. त्यावेळी त्यांनी सायकल वारीची संकल्पना स्पष्ट केली. सूत्रसंचालन सर्वप्रिय निर्मोही यांनी केले.

यावेळी पालखी सोहळा संघाच्या वतीने सूर्यकांत भिसे यांनी तर घुमान येथील नामदेव दरबाराचे प्रमुख, तरसेमसिंग बावा यांनी सत्कार केला. तर राज्यपालांच्या वतीने सायकल वारीबद्दल सूर्यकांत भिसे व निरंजन नाथ गुरू शांतीनाथ यांचा सत्कार केला. यावेळी संत नामदेव यांच्या जीवनावरील आधारित अनिमेटेड फिल्मचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. निर्माते विलास बालवडकर, माधवी निगडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!