एक लाख रुपयांसाठी मुलीने केला आईचा खून, कपडे धुण्याच्या दगडावर आपटले वृद्ध आईचे डोके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,अकोला,दि १२: तीन मुलीच असल्याने आईने तिघींच्याही नावाने शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी करून दिली होती. कविताला सात गुंठे जमीन अधिकची देण्यात आली होती. ते गुंठे कविताने विकल्यानंतर आईने तिला त्यातील एक लाख रुपये मागितले. पैसे देण्याच्या वादातून कविता आणि आईमध्ये वाद झाले. त्यानंतर कविताने आईला दगडावर आपटून तिचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिरी नगरातील स्वप्न शिल्प अपार्टमेंटमध्ये घडली. सुरुवातीला आई पडली आणि तिच्या डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला असा बनाव कविताने केला होता. मात्र, तिला पोलिस खाक्या दाखवताच तिने आईच्या हत्येची कबुली दिली.

सरुबाई काशीनाथ कांडेलकर वय ६१ यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र पोलिसांनी सरुबाई यांची मुलगी कविता दिनकर बायस्कर वय ४० हिला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. आईचे आणि माझे किरकोळ भांडण झाले. त्यात आई पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे ती पोलिसांना बनाव करत होती. मात्र घरातील रक्ताचा सडा पाहून पोलिसांना आधीच संशय आला होता. त्यानुसार पोलिसांच्या चौकशीत कविता पोपटासारखी बोलू लागली आणि पैशाच्या वादातून हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

सरुबाईला मुलगा नसल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी तिन्ही मुलींच्या नावे शेती करून दिली होती. कविताच्या वाट्याला सात गुंठे शिल्लक देण्यात आले होते व त्यातील काही रक्कम आईला देण्याचे ठरले होते. कविताने शिल्लक आलेले सात गुंठे विकले आणि दरम्यानच्या काळात मुक्ताईनगर येथे सरुबाई यांनी घर विकत घेतले होते. मात्र त्यांना एक लाख रुपये कमी पडत असल्याने त्यांनी कविताला एक लाख रुपये मागितले. देते देते असे म्हणून कविता आणि आई सरुबाईमध्ये कडाक्याचे भांडण झाले व त्यांच्यात झटापट झाली.

याचवेळी कविताने आई सरुबाई यांचे डोके घरातील कपडे धुण्याच्या दगडावर जोरजोरात आपटले आणि त्यातच सरुबाई यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार डी.सी. खंडेराव करीत आहेत.

चेहऱ्यावर कोणताही ममत्वभाव नव्हता

पोलिस जेव्हा कविताच्या घरात पोहोचले, तेव्हा तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यावेळी पोलिसांनी कविताला विचारले असता आई दगडावर पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असे सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर ममत्वभाव अजिबात दिसत नव्हते. तेव्हाच पोलिसांना तिच्यावर शंका आली होती. तसेच आईला ठार केले असताना कोणतेही प्रायश्चित्त कविताला पाहून दिसत नव्हते.

संपत्तीचा वाद कारणीभूत

तिन्हीही मुलीच असल्याने संपत्तीच्या वादातून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आईचे डोके आपटून मुलीने मारल्याच्या जखमा आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मुलीविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डी.सी. खंडेराव, ठाणेदार

आरोपी मुलीला आज न्यायालयामध्ये हजर करणार

आरोपी मुलगी कविता बावस्कर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पीएसआय चांभारे यांच्या तक्रारीवरून कविता बावस्कर हिच्याविरोधात आईला ठार केल्याच्या आरोपानुसार भादंविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. अटकेत असलेल्या कविताला पोलिस शुक्रवारी न्यायालयात हजर करणार असून तिच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!