विरोधकांना शिंदे-भाजपा सरकारची गेल्या बारा महिन्यातील विकासकामे ही मोठी चपराक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२३ | सातारा |
महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जी कामे करणे अपेक्षित होते, ती न केल्याने आपले राज्य १० वर्ष मागे जाण्याची भीती निर्माण झाली होती. महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करत आहेत. मात्र, त्यांना आमची गेल्या बारा महिन्यातील विकासकामे ही मोठी चपराक आहे, असा घणाघाती हल्लाबोल राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

ना. शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपाची युती घट्ट आहे. हे सरकार गतिमान असून सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले आहे. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी सरकारच्या गेल्या वर्षभरातील यशस्वी कामकाजांचा लेखाजोखा मांडला. येथील शासकीय विश्रामगृहात शंभूराज यांनी राज्य सरकारच्या वर्षभराच्या कामांची पत्रकारांना माहिती देऊन विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे उपस्थित होते.

ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, विरोधकांच्या आरोपांकडे आम्ही आता लक्ष देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या बारा महिन्यांमध्ये जे विकास प्रकल्प मार्गी लावले, ते झाले नसते तर राज्य दहा वर्षे मागे जाण्याची भीती होती. काही नेत्यांनी घरातूनच कारभार हाकत महाराष्ट्राच्या भवितव्याचा निर्णय घेतला होता. रोज रोज टीका करणार्‍या लोकांकडे आपण काय लक्ष देणार? त्यांची टीका आता आम्ही गांभीर्याने घेत नाही. १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आणणारे मुख्यमंत्री हे विरोधकांना दिसत नाहीत काय? विरोधकांनी कधी सकारात्मक विचार मांडले आहेत काय? असा रोखठोक सवाल देसाई यांनी केला.

एकनाथ शिंदे अयशस्वी मुख्यमंत्री आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली होती. त्यावर बोलताना देसाई म्हणाले की, गेल्या बारा महिन्यांची विकासकामे झाली, ती कामे अजितदादांना दिसत नाहीत काय? त्यांच्या विधानाला नक्की आधार काय? वित्त राज्यमंत्री म्हणून मीसुद्धा महाविकास आघाडीत काम केले आहे. त्यावेळी सुद्धा इतक्या गतीने निर्णय झाले नाहीत, तितके गतीने निर्णय या शासनाच्या काळात झाले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या विधानाला फार महत्त्व राहत नाही.

संजय राऊत यांनी पाटणमध्ये केलेल्या ‘भाडेकरू टीम’ या मुद्द्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांच्या तथ्यहीन बोलण्याकडे अजिबात लक्ष देता कामा नये. ते वारंवार बोलतच असतात. त्यांच्या बोलण्याने बरेच काही घडले आहे. संजय राऊत हे ‘चुकीची चिट्ठी काढणारे पोपट’, असे विधान मी यापूर्वीच केले होते. अजूनही त्यांचे तसेच वर्तन आहे.

अरबी समुद्रात साकारण्यात येणार्‍या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात बोलताना देसाई म्हणाले की, केंद्रीय खात्याच्या काही महत्त्वपूर्ण परवानग्या आणि त्यांचा पाठपुरावा गेल्या अडीच वर्षात झाला नव्हता, त्या सर्व परवानग्या आता अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची निविदा काढली जाईल.

वर्णे व निगडी येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात तेथील भूमिपुत्रांनी विरोध दर्शवला होता. या मुद्द्यावर बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, यासंदर्भात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जर काही मत व्यक्त केले असेल तर ते विचारात घेतले जाईल. यासंदर्भात अजूनही तेथील स्थानिक मला भेटायला आलेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. हे सरकार विकास करणारे आहे. कोणताही निर्णय जबरदस्तीने लादणारे नाही. विचार करूनच निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी तब्बल ९६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सातारा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक आराखडा हा १२ टक्क्याने वाढविण्यात आला असून ४६० कोटी रुपयांची तरतूद तसेच येथील पोवई नाक्यावरील शिवस्मारकाला १६ कोटी रुपयांचे अनुदान, पाटण येथे खंडाळा नाशिकच्या धरतीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सातारा जिल्ह्यातील निरा-देवघरसह पाणी योजनांना पाच हजार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, जिल्ह्यातील किल्ल्यांसाठी डीपीमधून दहा कोटींचा निधी, जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी ६० कोटी रुपये, शेतकरी बांधवांना २४ तास वीज, प्रतापगडावर भव्य स्वरूपाचा भगवा ध्वज, पोलिसांना सहा मिनी बस, ५० बाईक, पाच पिढ्यांना भूकंप दाखले देण्याचा महत्त्वाचा निर्णय, ‘शासन आपल्या दारी’ या माध्यमातून २ लाख ७४ हजार ३४८ लाभार्थ्यांना मदत, कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, जलयुक्त शिवार टप्पा दोन तसेच ३११२ कोटी रुपयांचा विमा हप्ता, बारा लाख शेतकर्‍यांना ४ हजार २८३ कोटींचे अनुदान वाटप, अशा विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धडाकेबाज निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, खोक्यांची टीका करणारे विरोधक यांनी गेल्या अडीच वर्षात नोटा छापण्याचे उद्योग केले. सध्या कोविड औषध खरेदी, सिंचन प्रकरणे तसेच विविध माध्यमातून झालेल्या खरेदी या प्रकरणांच्या चौकश्या सध्या सुरू आहेत. त्यामुळे कोणी खोके छापले, कोणी बेडमध्ये नोटा लपवल्या, याचे सत्य लवकरच बाहेर येणार आहे. त्यामुळे कोण खोके सरकार, हे लवकरच जनतेला समजणार आहे, अशी कडवट प्रतिक्रिया आमदार जयकुमार गोरे यांनी केली. जिहे कठापूर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने माण-खटाव तालुक्यातील दुष्काळाच्या उच्चाटनाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी शासनाच्या काळात श्रेयवादातून या धरणाच्या कामाची निविदासुद्धा काढू देण्यात आली नव्हती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना असे वागणे शोभत नाही, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. म्हसवड एमआयडीसी तसेच बेंगलोर-पुणे कॉरिडॉर, त्या माध्यमातून २५००० जणांना रोजगार, टेंभूच्या धरणकामामुळे ७५ गावांना पाणी, निरा-देवघर प्रकल्पाला ३१०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, यामुळे केंद्र शासनाने सातारा जिल्ह्याच्या सिंचन योजनांना मोठी गती दिली असून हे काम केवळ राजकारणातून महाविकास आघाडीने मागे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!