दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यातील दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे निरा देवधर धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्प मंजूर झाला आहे व तो अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रकल्प फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी पोहोचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यापासूनच केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मिळविला आहे. त्यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे आज फलटण तालुक्यातील प्रत्येक गावाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पोहोचत आहे.
या प्रकल्पामुळे आदर्की ते आंदरुड पर्यंत पाणी पोहोचणार आहे, ज्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. माणिकराव सोनवलकर यांनी या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी केली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली काही सूचना दिल्या आहेत.
यावेळी युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कार्यकारी अभियंता बोडके यावेळी उपस्थित होते.