
सातारा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यावेळी व्यासपीठावर डावीकडून सुनिताराजे पवार, मिलिंद जोशी, श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री उदय सामंत, आ. भरत गोगावले व इतर.
स्थैर्य, 4 जानेवारी, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता 100 वे मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो न भविष्यति’असे व्हावे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल आणि काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (दि.4) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सातार्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई, आमदार भरत गोगावले, महेश शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनिताराजे पवार, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रि्वनी नागराजन, प्रशासकीय अधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे संरक्षक, ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांचा तसेच व्ही. पी. परांजपे ऑटो कास्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऋषिराज यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मराठी जागतिक व्यवहाराची भाषा होण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री
साहित्य संस्थांमध्ये कोणताही राज्यकीय हस्तक्षेप नसेल आणि हिंदी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल असा निर्वाळा देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, माय मराठीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. आपली तपश्चर्या फळाला आली अशी भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठीसाठी जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने भाषा केंद्र सुरू केले आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंच सुरू केले आहेत. मराठी भाषेसमोर एआयचे आव्हान असले तरी मराठी ही केवळ संवादाची भाषा न राहता ती जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी संमेलनासाठी 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठ्यांचा पराक्रम अंगाखांद्यावर खेळवणार्या सातार्यात हे संमेलन होत आहे याचा खूप आनंद आहे. त्यामुळे संमेलनाला काहीही कमी पडू नये, अशी आमची भावना होती. ज्या मोठ्या संख्येने मराठी साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखवली त्यामुळे संमेलनाची शोभा वाढली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा 99 वर्षे सुरू असलेला साहित्यमेळा आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा हा उत्सव आहे. मराठी स्वाभिमानाचे हे माहेरघर आहे. मराठी भाषेचा, साहित्याचा हा महाकुंभ आहे. 100 वर्षे चाललेला असा उपक्रम अन्य कोणत्याही भाषेत नाही ही मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे.
गावागावांत एसटी स्थानकांवर पुस्तकांसाठी गाळे उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री
मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी गावागावांत जिथे एसटी स्थानके आहेत तिथे पुस्तकविक्रीचे गाळे सुरू करावेत, अशी मागणी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात केली होती. त्याचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, करतो, सांगतो, पाहतो असे सांगून नुसती आश्वासने मी देत नाही. परिवहन मंत्र्यांना सांगून ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. तसेच मराठी भाषेच्या संदर्भातील इतरही मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करू, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे : श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय संमेलनातील कार्यक्रमांचा आढावा घेऊन स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या चार दिवसात चवळपास आठ लाख साहित्यरसिकांनी भेट दिली याबद्दल मी आभार मानतो. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे 33 वर्षांपूर्वी सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मला मिळाले याचा विशेष आनंद आहे. त्यावेळप्रमाणेच यंदाचेही संमेलन यशस्वी झाले आहे, याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळविलेल्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात अटकेपार गेला. थोरल्या शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास झाकोळला गेला आहे. आपल्या लेखणीतून छत्रपतींचा देदिप्यमान इतिहास समाजासमोर आणणार्या संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावरही प्रकाश टाकावा, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील नाट्य संमेलनाचे यजमानपदही सातार्याला मिळावे, अशी मागणी त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केली. शासनस्तराव्यतिरिक्त मैत्रीच्या भावनेतून संमेलनाला मिळालेल्या सहकार्याबद्दल उदय सामंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पुढील साहित्यिक तसेच नाट्यविषयक उपक्रमांसाठी ‘अर्थपूर्ण’ मैत्री जोपासावी अशी मिश्किल भाषेत टिप्पणी केली.
साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण निर्मिती विनोद कुलकर्णी म्हणाले, 12 वर्षांच्या प्रयत्नानंतर सातारा नगरीला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. शताब्दी आधीचे संमेलन असल्याने दडपण होते. संमेलन यशस्वीरित्या पार पडले म्हणजे उपक्रमाचा शेवट झाला असे नाही तर या निमित्ताने सातार्यात पुन्हा एकदा साहित्यिक, सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्यिक चळवळ यशस्वी करून सातार्याचा बुलंद आवाज महाराष्ट्रात गुंजत ठेवू.
मसाप शंभरावे संमेलन पुण्यात घेणार
99व्या संमेलनाने काय मिळविले याचा उहापोह करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलनातून दूर गेलेल्या रसिकांना या संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहित्याच्या मांडवात आणण्याचे कार्य केले आहे. हे संमेलन वाचककेंद्री, साहित्यकेंद्री आणि पुस्तककेंद्री करण्यात यश मिळाले आहे. सत्ताधार्यांच्या उपस्थितीत मराठी भाषेचा कळवळा साहित्य महामंडळ ठामपणे मांडू शकते हेही या संमेलनाने दाखवून दिले आहे. या संमेलनाची स्पंदने सातारच्या मातीत दीर्घकाळ रेंगाळत राहतील, यातून अनेक नवे साहित्यि निर्माण होतील हा विश्वास आहे. राबणारे हजारो हात सातारकरांच्या माध्यमातून मिळाल्याने हा सोहळा देखणा झाला आहे. संमेलनात घडलेल्या अप्रिय घटनांना साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिकांनी झुरळासारखे झटकले आणि हे संमेलन प्रचंड उपस्थितीने यशस्वी झाले, हे खरे साहित्यप्रेम आहे. संमेलनाचा निधी 50 लाख रुपयांवरून 2 कोटी करण्याचे श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते. उदय सामंत हे उद्योग व भाषा मंत्री असल्याने भाषेच्या पाठीशी त्यांनी उद्योग उभे केले तर मराठी भाषेला काहीही कमी पडणार नाही. 1878 साली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन झाले हे वर्तुळ पूर्ण करताना शंभरावे संमेलन पुण्यात होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषद त्याचे आयोजन करणार आहे.
राज्यकर्त्यांकडून साहित्य संस्थांची ताकद वाढवण्याचे काम – उदय सामंत
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : राज्यकर्त्यांनी साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी मागणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून व्यक्त होत असली तरी कोणत्याही राजकारण्यांनी तो प्रयत्न केलेला नाही. त्या उलट साहित्य संमेलनाची आणि साहित्य संस्थांची ताकद वाढवण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत, अशी भूमिका राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मांडली. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यामध्ये उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना मोजक्या शब्दांत आढावा घेतला.
ग. दि. माडगुळकर यांच्या नावाने माजी संमेलनाध्यक्षांना सन्माननिधी..
उदय सामंत म्हणाले, साहित्य संमेलनासाठी पूर्वी 50 लाख रुपयांचा निधी सरकारतर्फे दिला जात होता. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ती रक्कम दोन कोटी रुपये केली. मागील वर्षापासून त्यात भर घालून साहित्य संमेलनासाठी 3 कोटी रुपये द्यायचे ठरवले. या शिवाय, पुढील वर्ष हे साहित्य संमेलनाचे 100 वे वर्ष आहे हे लक्षात घेऊन आजवरच्या 100 संमेलनाध्यक्षांना ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सन्माननिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 100व्या संमेलनाचे जे अध्यक्ष असतील त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने वर्षभर सन्माननिधी देण्यात येणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने स्मारक उभे करण्यासाठी एमआयडीसीतर्फे जमिन प्राप्त केली आहे. ते काम लवकरच सुरू होणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. सहा वर्षांपूर्वी साहित्य परिषदेच्या इमारतीच्या डागडुजीसाठी 50 लाख रुपये मंजूर केले होते. आज त्यात भर घालून 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. राज्यकर्ते साहित्य संस्था व मराठी भाषेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि ते साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करत नाहीत. या उलट मराठी भाषेसाठी जे जे करावे लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 1 कोटी रुपयांचा हा धनादेश एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
