सातारा जिल्ह्यातील साहित्यिक व मराठी भाषा प्रेमींच्यावतीने पंतप्रधानांचे आभार : रविंद्र बेडकिहाळ व विनोद कुलकर्णी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | गेल्या अनेक वर्षांच्या मराठी भाषा प्रेमींच्या मागणीला न्याय देत केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आज बहाल केला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे सातारा जिल्ह्यातील साहित्यिक व मराठी भाषा प्रेमींच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ व विनोद कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

याबाबत बोलताना रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही तमाम मराठी बांधवांची मागणी होती; यात आपला सातारा जिल्हाही आघाडीवर होता. सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांच्या मुख्य पुढाकारात आम्ही या मागणीसाठी ऐन थंडीमध्ये थेट दिल्ली येथे महाराष्ट्र सदनमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक आंदोलन करुन केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेकडूनही या मागणीसाठी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हजारो पत्रे केंद्र सरकारला पाठवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध कार्यक्रम, साहित्य संमेलनांच्या माध्यमातूनही सातत्याने या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच महाराष्ट्र शासनातही या मागणीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचेही नुकतेच सातारा येथे विनोद कुलकर्णी व हरिष पाटणे यांनी या मागणीकडे लक्ष वेधले होते. मराठी भाषेला सरकार दरबारी मिळालेला न्याय निश्‍चितच गौरवास्पद आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!