तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापनामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


वडवळ येथे पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप

स्थैर्य, सोलापूर, दि. 4 : येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

वडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदार, जि.प. सदस्य तानाजी खताळ, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, उपसरपंच धनाजी चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, मृद शास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ बी. एस. कदम, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ना. भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषीमंत्री, आयुक्त, अधिकारी बांधावर जावून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवश्याची झाली आहे. मात्र पीक पद्धती, उसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा’.

यावेळी त्यांनी बनावट खते किंवा उगवत नसलेल्या बियाण्यांच्या तक्रारीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्याचे आहेत, गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नका, मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

पाटील म्हणाले, ‘खते, बी-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नवतंत्रज्ञाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी पीक लागवड करावी. साखरेच्या दराचे मूल्यांकन झाल्यास ऊस पीक फायदेशीर ठरणार आहे.’

बिराजदार म्हणाले, कमी खतात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. कृषीमंत्री, आयुक्त, अधिकारी हे शेतकऱ्यांना गावोगावी जावून पीक पद्धती, पाण्याचा वापर, सेंद्रीय खते यांची माहिती देत आहेत. जिल्ह्यात 147 मिमी पाऊस झाला असून 100 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खतांची कोणतीही अडचण नाही, बियाण्यांच्या समस्याही सोडवल्या आहेत.

डॉ. कदम यांनी ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन केले. ऊस लागवडीसाठी कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या तंत्रज्ञाचा वापर आणि योग्य नियोजनाने अपेक्षित उत्पादन मिळत आहे. 4/5 वर्षात उसाच्या बेण्यामध्ये बदल करावा. जमिनीची उत्पादन क्षमता, लागवडीचे तंत्रज्ञान, पाणी नियोजन आणि अन्न द्रव्य व्यवस्थापन याकडे लक्ष दिल्यास उसाचे भरघोस उत्पादन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खते, बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!