दुर्गम भागात पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करा – गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । सातारा । दुर्गम भागात पोलीस वसाहत निर्माण करण्यासाठी  त्वरीत प्रस्ताव सादर करा, असे निर्देश आज गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय  अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दुर्गम भागांतील पोलीसांसाठी  कामकाजाच्या ठिकाणी नजीक राहण्यासाठी  घर असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस विभागाने अशा दुर्गम भागातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करुन सादर करावा. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  त्याच बरोबर पोलीस स्टेशन उभारणीबाबतचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

येत्या 5 ऑक्टोबरपासून शाळा व  महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्पामधून बंदोबस्त ठेवावा.

यावेळी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण शाळेतील विद्यार्थींनींच्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी किमान 10  तज्ज्ञ प्रशिक्षकांची  नेमणूक करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच समाज कल्याण विभागाने आश्रमशाळेतील मुलींनाही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनही त्यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!