
स्थैर्य, सातारा दि.29 : बेभरवशाचे हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, मजूरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च अशा विविध समस्यांमधून शेतकरी सध्या जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांनी काटेकोर व अचूक व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन घेण्याकरिता ‘प्रीसिजन फार्मिंग’ची म्हणजेच काटेकोर पध्दतीने शेती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे या गावातील सुनील जगताप यांच्या ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत पेरणी यंत्राद्वारे टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणी केलेल्या प्लॉटला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी 20-25 क्विंटल असताना सुनील जगताप यांनी 2019 च्या खरिपात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सरीवर टोकण पद्धतीने एकरी फक्त 15 किलो बियाणे वापरून सोयाबीनचे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. जे की हेक्टरी 50 क्विंटल झाले.
यावेळी विजय राऊत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी सरीवर टोकण पद्धतीने लागवड करणेसाठी मोहीम हाती घेण्यात आलेली असून हेक्टरी 50 क्विंटल सोयाबीन चे उत्पादन घेण्याचे लक्षांक साध्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, अजित पिसाळ, कृषी अधिकारी प्रकाश राठोड मंडळ, कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे, कृषी सहायक निखिल मोरे, तानाजी यमगर, आदी कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.