
स्थैर्य , मुंबई, दि.१५: राज्यात शुक्रवारपासून ग्रंथालये, आठवडी बाजार, बागबगिचे, पार्क सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सव, दिवाळी सणाच्या तोंडावर व्यावसायिक प्रदर्शनांनाही मुभा देण्यात आली आहे. शाळा-कॉलेज मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच मुंबईतील मेट्रो रेल्वे सेवेलाही शुक्रवारपासून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यातील वादाचे केंद्र ठरलेली धार्मिक स्थळे बंदच राहणार असून नव्या नियमावलीत धार्मिक स्थळे उघडण्याबाबत भाष्य नाही. राज्य सरकारने मिशन बिगिनअंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवर राज्य सरकार समाधानी असून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातील व्यवहार सुरू हाेत असल्याचे म्हटले आहे.
काय सुरू?
> मुंबई मेट्रो, ग्रंथालय, गार्डन, पार्क, व्यावसायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स).
> स्थानिक आठवडी बाजार, जनावरांच्या बाजारालाही परवानगी.
> केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा.
> पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपासून संस्थेत उपस्थित राहण्यास मुभा.
> शाळेतील ५०% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी.
काय बंद?
> शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
> सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क्स, थिएटर सभागृहे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
> सामाजिक-राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी
वाचन प्रेरणादिनी होणार ग्रंथालयांची कवाडे खुली
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती १५ आॅक्टाेबर रोजी आहे. डॉ. कलाम यांच्या आदर्शांचे स्मरण होण्यासाठी हा दिवस महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो. गेले आठ महिने बंद असलेली ज्ञानाच्या भांडारांची कवाडे आता शुक्रवारपासून उघडतील. त्याला डॉ. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य लाभणे ही वाचन संस्कृतीला मिळालेली प्रेरणा व डॉ. कलांमाना वाहिलेली अनोखी आदरांजली ठरेल.