
5 कोटी 75 लाख रुपये दंड आकारणी; 75 हजार वाहने जप्त – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
स्थैर्य, मुंबई, दि. 28 : राज्यात लॉडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 1 लाख 16 हजार गुन्ह्यांची नोंद झाली. 5 कोटी 75 लाख रुपये दंड आकारणी व 75 हजार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. 22 मार्च ते 27 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,16,670 गुन्हे नोंद झाले असून 23,314 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 5 कोटी 75 लाख 30 हजार 267 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाईकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 254 घटना घडल्या. त्यात 833 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
100 नंबरवर 96 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 96,697 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा 706 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1323 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 75,813 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 21 पोलीस व 1 अधिकारी अशा 22 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नकाकोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.