श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने रायगडावर बुधवारी शौर्य दिन सोहळ्याचे आयोजन 


 स्थैर्य, 17 मार्च, सातारा : स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली, त्यावेळी झालेल्या घनघोर लढाईत कोरेगावचे समशेरबहाद्दर राजर्षी खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय असे शौर्य गाजवले. उद्या बुधवार दि. १८ मार्च रोजी या गौरवशाली घटनेला २५३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथील श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने रायगड येथे शौर्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने इतिहास संशोधक पांडुरंग सुतार व ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी दिली.
रायगड तिसऱ्यांदा स्वराज्यात आणण्यासाठी झालेल्या लढाईत राजर्षी खंडेराव बर्गे यांनी मोठे शौर्यगाजवले. रायगडावरील तेव्हा सिहांसनासमोर येऊन सरदारांनी रुप्याची फुले उधळली. या घटनेस बुधवारी २५३ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरेगावकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यानिमित्ताने समस्त बर्गे कुटुंबातील सदस्यांसह अठरापगड जातीचे शेकडो लोक बुधवारी रायगडावरती उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन राजसिंहासनासमोर भगवा ध्वज फडकावला जाणार आहे. तद्वत राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले जाणार आहे.
म्हसवडच्या मंदिरात मोठी घंटा..
किल्ले रायगड तिसऱ्यांदा जिंकून स्वराज्यात आणल्यावर साताऱ्याचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी राजश्री खंडेराव बर्गे यांना समशेरबहाद्दर या किताबासह इनाम वतन दिले. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर खंडेराव बर्गे यांनी आपल्या घराण्याचे कुलदैवत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये भली मोठी पितळी घंटा अर्पण केली. आजही ही पितळी घंटा श्री सिद्धनाथ मंदिरात प्रवेश करताना पाहावयास मिळते. त्यावरती सरदार खंडेराव बर्गे अशी कोरलेली अक्षरे दिसत आहेत.


Back to top button
Don`t copy text!