
दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । साखरवाडी ता. फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा सन २०२२/२३ चा ४ था गळीत हंगाम शुभारंभ आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष महंत प. पू. विद्वांस श्यामसुंदर शास्त्री होते.
एनसीएलटीच्या माध्यमातून ४ वर्षांपूर्वी हस्तांतरण झालेल्या या कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले असून पूर्वीचा प्रतिदिन ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना यावर्षी प्रतिदिन ७ हजार मेट्रिक टन म्हणजे दुप्पट क्षमतेने गाळप करणार असून २९ मेगावॅट सह वीज निर्मिती प्रकल्प, आसवणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील वाढत्या ऊस क्षेत्राचे गाळप वेळेत होण्यास मदत होणार असल्याचे कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
श्रीदत्त इंडिया कंपनी ऊसाच्या चोख पेमेंटमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली असून शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस या कारखान्याकडे गाळपासाठी पाठविण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.
कार्यक्रमास कंपनीच्या चेअरमन कार्यकारी संचालिका प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धरु, चेतन धरु, परीक्षित रुपारेल, करण रुपारेल, ऊद्धव रुपारेल, व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले, संचालक शरदराव रणवरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सतीश माने, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर व सौ. रेश्माताई भोसले, माजी उपसभापती महादजी संकपाळ, पंचायत समिती माजी सदस्य सागर कांबळे, संजय भोसले, अभयसिंह नाईक निंबाळकर, शरदराव जाधव, अंकुश साळुंखे, दिलीप पवार, माजी उपसरपंच समीर भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपट भोसले, पै. संतोष भोसले, पै. महेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, गोरख भोसले, संजय जाधव, चीफ अकौंटंट अमोल शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी सदानंद पाटील, जनरल मॅनेजर सी. टी. साळवे, भारत तावरे, चीफ इंजिनिअर अजित कदम, डेप्युटी चीफ नितीन रणवरे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.