सातारा जिल्ह्याचे शेतीत ऐतिहासिक पाऊल

कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित फळशेतीचा यशस्वी शुभारंभ


स्थैर्य, 13 मार्च, सातारा : सातारा जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेती क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ’नाविण्यपूर्ण आधुनिक फळबाग उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित फळबाग विकास प्रकल्प’ अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता AI युनिट्सच्या स्थापनेला जिल्ह्यात यशस्वी सुरुवात झाली आहे.

या प्रायोगिक प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना आता आपल्या फळपिकांची स्थिती, हवामानातील बदल, मातीतील ओलावा तसेच कीड व रोगांचे व्यवस्थापन यांबाबत ’रिअल-टाइम’ (तात्काळ) माहिती मिळणार आहे. आधुनिक AI यंत्रणेद्वारे होणार्‍या या विश्लेषणामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन वाढणार आहे, शिवाय औषधे आणि खतांच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात -ख तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, या प्रकल्पाचे निष्कर्ष भविष्यात संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. -ख आधारित यंत्रणेमुळे पिकांचे सतत निरीक्षण करणे आणि अचूक निर्णय घेणे शक्य होईल. विशेषतः उच्च मूल्य असलेल्या फळपिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

5 तालुक्यांतील 12 गावांची निवड

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील एकूण 725 हेक्टर क्षेत्रावर राबवला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रातील सलग फळबागांचा समावेश आहे. निवडलेली तालुके आणि गावे खालीलप्रमाणे आहेत:

  • सातारा तालुका: पाडळी
  • खटाव तालुका: कलेढोण, निमसोड
  • फलटण तालुका: धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी, निरगुडी
  • माण तालुका: मार्डी, हवालदारवाडी, कारखेल, भाटकी
  • जावळी तालुका: आखाडे

प्रकल्पात सहभागी होणार्‍या इच्छुक शेतकर्‍यांना केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर फळपीक उत्पादन वाढ, कीड-रोग नियंत्रण, एक्सपोर्ट गुणवत्ता आणि कृषी -ख बाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कीड व्यवस्थापनासाठी ’ट्रॅप्स-ल्युर्स’ (Fruitfly Trap) आणि इतर तांत्रिक सहाय्य देखील पुरवले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची शेती आता ’स्मार्ट’ आणि ’प्रिसिजन’ शेतीकडे वळली असून, डिजिटल कृषी व्यवस्थेच्या दिशेने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!