
सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी भाजप खासदार गटातून संदीप शिंदे (सरकार) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कै. खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत आणि जनसेवेचा वसा घेतलेल्या शिंदेंसाठी पंचक्रोशीतून मागणी वाढली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 04 जानेवारी : आगामी पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागताच फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेषतः सस्तेवाडी पंचायत समिती गणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भाजप खासदार गटाचे निष्ठावंत शिलेदार संदीप शिंदे (सरकार) यांची. ही चर्चा केवळ राजकीय अफवा नसून, गेल्या अनेक वर्षांच्या जनसेवेच्या आणि कामाच्या जोरावर उभी राहिलेली लोकचळवळ असल्याचे चित्र पंचक्रोशीत पाहायला मिळत आहे.
माजी खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून संदीप शिंदे यांची ओळख आहे. विचारांशी प्रामाणिक राहून आणि संघटनेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता शांतपणे काम करणाऱ्या या नेतृत्वाची दखल आता जनतेनेच घेतली आहे.
‘नेतृत्व म्हणजे सेवा’ हेच ब्रीद!
संदीप शिंदे यांनी “नेतृत्व म्हणजे सेवा” हे तत्त्व केवळ बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. सस्तेवाडी आणि परिसरातील गावागावातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी, संदीप शिंदे यांनी नेहमीच पुढाकार घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिला यांच्या प्रश्नांसाठी सतत मैदानात असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
पंचक्रोशीचा एकच आवाज
सध्या सस्तेवाडी गणात संदीप शिंदे हे केवळ उमेदवार म्हणून चर्चेत नाहीत, तर ते पंचक्रोशीच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपर्क पाहता, “काम करणारा नेता आणि विकासाची हमी म्हणजे संदीप शिंदे,” अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे. भाजप खासदार गटासाठी हा एक सक्षम, विश्वासार्ह आणि हक्काचा चेहरा असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि स्पष्ट भूमिका यामुळे संदीप शिंदे यांनी संघटनेला बळ दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सस्तेवाडी गणातून भाजप खासदार गटाची उमेदवारी संदीप शिंदे यांना मिळाल्यास विजयाचे गणित सोपे होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

