
फलटणचे युवा नेते आणि जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम यांनी शरद पवार गटाला रामराम ठोक करत अजित पवार गटात प्रवेश केला. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह झालेल्या या ‘भरती’मुळे आगामी निवडणुकीत ‘खासदार गटा’चे पारडे जड झाले आहे.
स्थैर्य, सातारा/फलटण, दि. ०७ जानेवारी : फलटणच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. फलटण तालुक्याचे माजी आमदार आणि दिग्गज नेते स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपुत्र, तथा जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवा नेते सह्याद्री कदम यांनी अखेर आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात’ जाहीर प्रवेश केला. साताऱ्यात झालेल्या या प्रवेश सोहळ्याने आणि त्यापूर्वी केलेल्या शक्तीप्रदर्शनाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सह्याद्री कदम यांचा हा प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
सातारा येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सह्याद्री कदम यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फलटण ते सातारा: शक्तीप्रदर्शनाचा ‘धुरळा’
या प्रवेशासाठी सह्याद्री कदम यांनी फलटण तालुक्यातून आपल्या समर्थकांची मोठी जमवाजमव केली होती. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी साताऱ्याकडे कूच केली. फलटण ते सातारा या मार्गावर आणि सातारा शहरात त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या शक्तीप्रदर्शनातून त्यांनी आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवून दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सह्याद्री कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने फलटण तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीचे, अर्थात ‘खासदार गटा’चे पारडे अत्यंत जड झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या नव्या समीकरणाचा मोठा फायदा भाजपा राष्ट्रवादीच्या महायुतीला होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
