
स्थैर्य, फलटण, दि. 13 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटाची ‘सुकाणू समिती’च फोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजे गटातील ज्येष्ठ नेतेच गट सोडून गेल्याने हा माजी खासदार रणजितसिंह यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राजे गटातील ज्येष्ठ नेते भीमदेव बुरूंगले, माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव आणि सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांनी पक्षाला रामराम ठोकला. हे सर्वजण राजे गटाच्या सुकाणू समितीत प्रमुख भूमिका बजावत होते. गटाचे निर्णय घेण्यात आणि रणनीती ठरवण्यात यांचा मोठा वाटा असायचा.
निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या आणि गटाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या नेत्यांनीच पक्ष सोडल्याने राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सलग पक्षप्रवेशांमुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, आता गटाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर राज्यातून टीका झाल्यानंतर, त्यांनी फलटण येथील गजानन चौक येथे एक खुली पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी अत्यंत संयमीपणे आपली उत्तरे दिली होती.
त्या पत्रकार परिषदेनंतर रणजितसिंह यांनी थेट राजे गटाच्या सुकाणू समितीत असलेल्या दिग्गजच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत जात असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणात शांतपणे व संयमाने उत्तर हे माजी खासदार रणजितसिंह यांनी दिल्यानेच सुकाणू समितीचे मत सुद्धा बदलले असल्याचे चित्र आहे.
नगरपरिषद निवडणूक जवळ आलेली असतानाच राजे गटाची प्रमुख फळीच विस्कळीत झाल्याने, आगामी काळात गट या धक्क्यातून कसा सावरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पक्षबदलांचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होणार हे निश्चित आहे.
