वारीसाठी अधिकाधिक शौचालये उपलब्ध करा

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले यांचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 15 जून 2025 । सातारा । आषाढी वारीच्याकालावधीत लाखो वारकरी त्यांच्या दिंड्यासह पुणे ते पंढरपूर मार्गस्थ होत असतात. या पालखी मार्गावर वारकर्‍यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासन काळजी घेत असते. वारीच्या कालावधीत प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी शौचालयांची उभारणी केली जाते. या तात्पुरत्या शौचालयांसमवेत जास्तीतजास्त स्वच्छतागृह उपलब्ध करण्यासाठी तसेच निर्मलवारीचा हेतू साध्य व्हावा, यासाठी पालखी मार्गावरील ग्रामस्थांनी त्यांचे वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

ज्या गावांमध्ये पालख्यांचा मुक्काम व विसावा असेल, अशा गावांतील कुटुंबांनी त्यांचे वैयक्तिक शौचालये त्या दिवसाकरिता वापरास उपलब्ध करून द्यावे, ग्रामपंचायतींनी देखील गावकर्‍यांना त्याबाबत आवाहन करावे. जे कुटुंब वैयक्तिक शौचालये वापरास देणार आहे, अशा कुटुंबांची संमती घेऊन त्यांच्या घरावर पांढरा ध्वज लावण्यात येईल, जेणेकरून वारकर्‍यांपर्यंत योग्य माहिती समजेल.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले म्हणाल्या, प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यासह ग्रामस्थही वारकर्‍यांची सेवाकरतात. निर्मलवारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पालखी मुक्काम व विसावा गावात तात्पुरते शौचालयांची उभारणी केली जाते. दरम्यान, वारकर्‍यांची संख्या लक्षात घेता तालुक्यातून पालखी मार्गस्थहोत असताना पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स, सभागृहे, मंगल कार्यालये आदी ठिकाणी शौचालये वारकर्‍यांना वापरास उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. ज्या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन तसेच अन्य योजनांतून सार्वजनिक शौचालय बांधकाम केलेले आहे, त्या गावातील सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्यास तत्काळ देखभाल दुरुस्ती करावी, तसेच तेथे रस्ता, पाणी व विद्युत पुरवठा उपलब्ध करावा, अशा सूचना खंडाळा आणि फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकार्‍यांनाही केल्याची माहिती माने-भोसले यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!