बाजार समिती गाळे भाडेवाढीचे उपोषण म्हणजे ‘राजकीय स्टंट’ : श्रीमंत रघुनाथराजे


स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे भाडेवाढीवरून काही व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तीव्र टीका केली आहे. पणन संचालकांनी २८ ऑक्टोबर रोजी तोडग्यासाठी बैठक बोलावली असताना, हे उपोषण म्हणजे केवळ ‘राजकीय स्टंट’ आणि संस्थेला बदनाम करण्याचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी कागदपत्रांनिशी केला.

यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की, “भाडेवाढीचा प्रश्न चर्चेने सोडवण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचनेनुसार, पणन संचालकांनी २८ ऑक्टोबर रोजी पुणे येथे सर्व संबंधित घटकांची बैठक बोलावली आहे. असे असताना उपोषणाचा मार्ग अवलंबणे हे बेकायदेशीर आणि संस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.”

‘बहुसंख्य गाळेधारक भाडेवाढीच्या बाजूने’

यावेळी श्रीमंत रघुनाथराजे यांनी बहुसंख्य गाळेधारकांनी भाडेवाढ स्वीकारल्याच्या कराराची फाईल सादर केली. ते म्हणाले, “ज्यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण होत आहे, त्यांचा बाजार समितीत एकही गाळा नाही किंवा ते मूळचे फलटणचे रहिवासीही नाहीत. केवळ राजकीय हेतूने संस्थेची बदनामी केली जात आहे.”

“अनेक गाळे अनधिकृत, तरीही आम्ही माणुसकी दाखवली”

श्रीमंत रघुनाथराजे यांनी अनेक गाळे अनधिकृतपणे बांधले असल्याचेही निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, “काही गाळे तर प्रवेशद्वाराच्या जागी आणि जनावरांच्या बाजारात बांधले आहेत. आम्ही कारवाई करू शकलो असतो, पण माणुसकीच्या नात्याने कोणाचाही संसार उद्ध्वस्त होऊ नये, ही आमची भूमिका आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही.”

संस्थेच्या विकासाचे ध्येय

बाजार समितीला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. संस्थेच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. आम्ही वरच्या मजल्यावर शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन ट्रान्सक्रिप्शन’ हॉल तयार करत आहोत, जिथे त्यांना निर्यातीचे शिक्षण मिळेल. संस्थेच्या विकासासाठी काम करायचे की अशा राजकीय दबावाला बळी पडायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


Back to top button
Don`t copy text!