
दैनिक स्थैर्य । 27 मे 2025। फलटण । इस पूर्व काळगणनेचा हिशोब हा अंदाजांचा खेळ आहे. तो शास्त्रीय परिमाणात बसतोच असं नाही. म्हणूनच मी जे काही लिहतो आहे, त्याचा आधार आहे – स्थळ, काळ आणि पुराणकथा. यात तर्क, श्रद्धा आणि थोडा स्वआनंदही आहे. हे सगळं इतिहास किंवा पुरातत्वशास्त्राच्या व्याख्येत न बसणारं असलं तरीही प्रश्न येतो – मग लिहायचं कशाला? तर उत्तर आहे – श्रद्धा का आणि कशी निर्माण झाली याचा मागोवा घेण्याची माझी सवय आणि त्यातून मिळणारा आनंद. पहिला चरित्रकोशकार आचार्य अश्वघोष, प्रसिद्ध संशोधक जॉन ब्रॉकिंगटन, अल्फ हिल्टेबेईटल, जेम्स फिट्सगेराल्ड, बी. बी. लाल, डॉ. विष्णु सुखटणकर यांचं संशोधन सोडून मी थेट तुम्हाला घेऊन जातो – द्वापारयुगात!
हस्तिनापूर (आजचे दिल्ली ) ते खान्देश जवळपास 1000 किलोमीटरचं अंतर. त्या काळी विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेकडेही मानवी वस्ती होती. उज्जैन म्हणजेच प्राचीन अवंती, विदर्भातील कुंडिनपूर (आजचं कौंडीन्यपूर, अमरावती), या सगळ्याचा उल्लेख महाभारत काळात आहे, आणि ही स्थळं आजही अस्तित्वात आहेत. मग जळगाव ते हस्तिनापूर पायी प्रवास, मुक्काम घेत घेत, साधारण 60 दिवसांचा झाला असता. ही भूमी – अजिंठा आणि सातपुडा पर्वत रांगा, छोट्या-मोठ्या नद्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेली होती. पांडवांनी जुगार हरल्यावर 13 वर्षांचा वनवास पत्करला – त्यातील पहिले 12 उघडपणे आणि शेवटचं एक वर्ष अज्ञातवास. त्या वनवासाच्या सुरुवातीस ते त्यांच्या मातेसह एकचक्रा नगरीत वास्तव्य करत होते. पण एकचक्रा कुठे होती? काही दंतकथा सांगतात की, ती पश्चिम बंगालच्या रामपूरहाटजवळ होती, काही म्हणतात नागपूर-वर्धा मार्गावर केळझरजवळ. पण
काही दंतकथा सांगतात – ती नगरी म्हणजेच आजचं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल!
आता थोडा तर्कशुद्ध प्रवास करूया – दक्षिण भारतात जाण्यासाठी प्राचीन काळी विंध्य पर्वताच्या फटीमधून ‘अगस्त्य दरा’ मार्गे प्रवास केला जात असे. उज्जैनजवळील हा मार्ग, ऋषी अगस्त्य आणि ऋषी भ्रूगू यांच्याशी संबंधित आहे. भ्रूगू ऋषींचा आश्रम गिरणा नदीच्या काठी होता, जे आजचं भडगाव (भटग्राम) आहे. जर हे सगळं खरे असेल, तर एरंडोलच एकचक्रा नगरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कथा पुढे अशी – एकचक्रा नगरीत एक बकासुर राक्षस होता, जो रोज एका माणसाला आणि त्याच्यासोबत भरपूर अन्न मागवून गिळंकृत करत असे. पांडव ज्या ब्राह्मण कुटुंबात राहत होते, त्यांच्यावर ही वेळ आली. भीमाने पुढे येऊन, एकट्याने बकासुराचा वध केला. ही घटना घडली म्हणे – एरंडोलजवळील पद्मालय क्षेत्रात! पद्मालय – म्हणजे पद्म (कमळ) + आलय (स्थान). इथेच आहे भीमकुंड आणि कमळांनी नटलेला भव्य तलाव. या पवित्र स्थळीच विराजमान आहेत – उजव्या आणि डाव्या सोंडेचे दोन गणपती – अमोद आणि प्रमोद. भारतातील साडेतीन गणपती पीठांपैकी एक मानले जाणारे हे स्थान. पेशवेकालीन दस्तावेजांमध्ये याचा उल्लेख आहे, पण त्यापूर्वीचा इतिहास तितकासा लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र स्थानिक आख्यायिका, मंदिराभोवतीचे ओवर्यांचे अवशेष आणि नाथपंथीय प्रभाव हे दाखवतात की हे क्षेत्र एक काळी आध्यात्मिक मठही असावं. एरंडोल हे नाथ संप्रदायाचं प्रभावक्षेत्र, गोरक्षनाथ व अन्य नाथ संतांचं वास्तव्य, आणि आजही टिकून असलेली साधना परंपरा यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. पद्मालय डोंगराच्या कुशीत वसलेलं, निसर्गसौंदर्याने नटलेलं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कमळांनी फुललेला तलाव, त्याच्या काठावर उभं असलेलं गडद शांतता लाभलेलं मंदिर, आणि भाविकांची अखंड गर्दी – हे दृश्य आत्म्याला शांतता देणारं आहे.
जळगाव शहरापासून अवघ्या 30 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण आता हवाई मार्गाने मुंबई, पुण्याशी जोडले गेले आहे. त्यामुळे प्रवास सुलभ झाला आहे. तर आता वाट कसली पाहताय? या आणि स्वतःच्या डोळ्यांनी हा इतिहास अनुभवा. दर्शन घ्या अमोद-प्रमोद स्वरूपात वसलेल्या गणरायाचे. आणि हो… जळगावचं वांग्याचं भरीत, शेवभाजी आणि वरून केळीचा गोडवा – नक्की चाखा!
युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव