
दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । कोल्हापूर । शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवले. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे गेल्या सात दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहेत. सरकार दरबारी या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आहेत. त्यातूनच कासबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. महावितरणच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत महावितरणच्या कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या यासर इतर मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहेत. सरकारी कार्यालयांना आग लावणे, शासकीय कार्यालयात जिवंत साप सोडणे, अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे प्रकार संतप्त आंदोलकांकडून सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांवर महाविकास आघाडी सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आंदोलन भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.