नीरा खोऱ्यातील धरणसाठा ९३ टक्क्यांवर


स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण तालुक्यासह मोठ्या लाभक्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या नीरा खोऱ्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा ९३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. नीरा देवघर आणि वीर ही धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर असल्याने यावर्षीच्या पाण्याची चिंता मिटली असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. ७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नीरा देवघर धरण ९१.१३% भरले असून त्यात ८.८४ टीएमसी पाणीसाठा आहे. वीर धरण ९३.९४% भरले असून त्याचा साठा ८.८४ टीएमसी आहे. तसेच, भाटघर धरणात ९७.४९% (२२.९१ टीएमसी) तर गुंजवणी धरणात ७२.३६% (२.६७ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कालपर्यंत वीर धरणातून नीरा नदीत सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे. तथापि, शेतीच्या सिंचनासाठी कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे.

एकंदरीत, सर्व प्रमुख धरणे काठोकाठ भरल्याने यावर्षी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. धरणांतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनाचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!