
स्थैर्य, नांदेड/हदगाव, दि.२: हदगाव येथील किराणा व्यापारी प्रवीण कवानकर यांनी पत्नी, एक मुलगा व दोन मुली अशा एकूण ५ जणांनी सहस्रकुंड धबधब्यात ५-६ दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. इस्लापूर पोलिसांनी दाखवलेल्या त्यांच्या कपडे व सामानावरून तिघांची ओळख पटवण्यात आली. दोन मुलींचे मृतदेह अद्यापही मिळाले नाहीत.
कवाना येथील रहिवासी भगवानराव कवानकर यांचे हदगावात मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांत संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माेठा मुलगा प्रवीण कवानकर यांनी किराणा दुकानातील हिस्सा मागितला. मात्र तडजोड न झाल्याने त्यांच्या लहान भावाने दुकानाला कुलूप लावल्याची चर्चा आहे. प्रवीण यांची एक मुलगी फिजिओथेरपिस्ट अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला, तर दुसरी शिक्षण घेत होती. मुलगा १३ वर्षांचा आहे.
कार किरायाने घेऊन सहस्रकुंडाला गेले अन् मृतदेहच सापडले
प्रवीण हे हदगावमधील एक चारचाकी गाडी किरायाने घेऊन कुटुंबासह ढाणकीला (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) गेल्याचे समजते. तिथून त्यांनी आमचा मेहुणा येणार आहे, असे सांगत गाडीचालकाला सहस्रकुंडला सोडण्यास सांगितले. यानंतर हे कुटुंब कुठे गेले कुणालाही माहिती नव्हती. त्यानंतर जवळपास पाच-सहा दिवसांनी या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
मुरली गावातून धबधब्यात उड्या
प्रवीण (४२), पत्नी आश्विनी (३८), सेजल (२०), समीक्षा (१४) आणि सिद्धेश (१३) यांनी यवतमाळच्या मुरली गावातून सहस्रकुंड धबधब्यात उड्या मारल्या. बुधवारी प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक, तर सिद्धेश व अश्विनी यांचे मृतदेह दराटी (जि. यवतमाळ) परिसरात आढळले. समीक्षा व सेजल यांचा गुरुवारपर्यंत शोध लागलेला नाही.