
स्थैर्य, दि.१२: ग्रिड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला आहे. शहरातील वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. याबाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणार्या विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे शहरातील कार्यालये, लोकल रेल्वे ठप्प झाली असून रुग्णालयांनाही याचा फटका बसला आहे. ग्रीड बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असल्याची पुष्टी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट [बेस्ट] च्या प्रवक्त्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 400 केव्हीची लाइन खराब झाली आहे. यामुले एमआयडीसी, पालघर, डहाणू भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील कॉलेजमध्ये सोमवारी होणाऱ्या अंतिम वर्षांच्या ऑनलाइन परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणारी सुनावणी देखील थांबवण्यात आली.
मुंबईच्या रुग्णालयांतील वीजपुरवठा गेल्यामुळे व्यवस्था ढेपाळली. शहरातील 6 कोविड रुग्णालयांत जनरेटरद्वारे काम सुरू करण्यात आले.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सीपीआरओ म्हणाले की, ग्रीड बंद झाल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेला फटका बसला आहे. चर्चगेट आणि वसई दरम्यान पश्चिम रेल्वेची लोक रेल्वे देखील प्रभावित झाली आहेत.
यादरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, मुंबई आणि आसपासच्या विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. एका तासात हा पुरवठा सुरळीत होईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसईने ट्विट मध्ये म्हटले आहे की तिथे सामान्य काम चालू आहे.
मुंबईत दररोज 3000-3200 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. मात्र दिवस आणि रात्रीचा वीजपुरवठ्याचा रेशो वेगळा असतो. एका रिपोर्टनुसार, अडाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड मुंबई उपनगरांमध्ये 27 लाख ग्राहकांना वीजपुरवठा करतो. यामध्ये 21 लाख घरगुती ग्राहक आहेत. तर टाटा पावर सुमारे 7 लाख ग्राहकांनी वीजपुरवठा करते.