
स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : “गेले १५ दिवस सुरू असलेल्या मनोमिलनाच्या चर्चेवर खासदार गटातील एकाही कार्यकर्त्याचा विश्वास नाही. आमची सर्व भिस्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच आहे आणि ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाहीत,” असा ठाम विश्वास फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. “श्रीमंत रामराजे यांचे राजकारण हे कायम विश्वासघातकी राहिले आहे. गरज पडेल तेव्हा तालुक्यातील राजकारण्यांचा वापर करायचा व नंतर फेकून द्यायचे, हे सर्व तालुक्याने ओळखले आहे,” असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
फलटण तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय मनोमिलनाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अशोकराव जाधव यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, “१९९५ पासून लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्यासह, स्वर्गीय हणमंतराव पवार यांचे पुत्र तेजराज पवार, स्वर्गीय कृष्णचंद्र भोईटे, श्री. प्रल्हादराव साळुंखे-पाटील, स्वर्गीय सुभाषराव शिंदे, स्वर्गीय चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम आणि अलीकडे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचा वेळोवेळी कसा वापर केला गेला, हे तालुक्याला माहिती आहे.”
“आज फलटण तालुक्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने एक खंबीर, लढवय्या आणि एकवचनी नेता मिळाला आहे. त्यांच्यात तालुक्याची एकहाती सत्ता घेण्याची ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये. रणजितसिंह नाईक निंबाळकर लवकरच आपली भूमिका जाहीर करतील,” असेही अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.