
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। सातारा । महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित शुक्रवार दि. दि. 2 ते रविवार दि. 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, ब्रॅन्ड अँब्यासिटर मृणाली देव-कृलकणी, नवेली देशमुख, जपानचे कॉन्सुलेट जनरल यमाशिता सान आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, असे सांगून उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविधसाहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विवविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फुड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे. बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे ब्रॅन्डीग व्हावे यासाठी कायम स्वरुपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. बामणोली खोर्यात केबल पुल बांधण्यात येत आहे. त्यावर विव्हिंग गॅलरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पुल, तापोळा तेटली येथे होणारा पुल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे.
यावेळी त्यांनी महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, त्यांना सुरक्षीत वातवरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करुन या उपक्रमाबद्दल शंभूराज देसाई यांचे कौतुक केले. पर्यावरणाचा र्हास व तपापमान वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. शेतकर्यांसाठी किफायतशिर ठरणार्या बांबु लागवडीला चालना दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक राज्ये पर्यटन उद्योगावर चालतात आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे यासाठी काम करा, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याचे ब्रॅन्डींग जगभरात करण्यासाठी या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोसत्वाच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. नटलेले, सुशोभित झालेले महाबळेश्वर पहायला मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे. सर्वांनी मिळून हा महोत्सव यशस्वी करुया, पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी पर्यटन सुरक्षा दल निर्माण केले असून प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर येथे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन येत्या काळात पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महापर्यटन उत्सवाला शुभेच्छा देत असताना या उपक्रमाबद्दल आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या कलपकतेबद्दल कौतुक केले. महाबळेश्वर, कोयनेचा परिसर अत्यंत सुंदर आहे. कोकणाला जोडणारा पुल तयार होत असल्याने याचा फायदा पर्यटन वाढीला निश्चतपणे होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुड फेस्टीवल फ्ली बाजार, कीड्स झोन, वेण्णा लेख येथील तरंगता बाजार, प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या. गोल्फ क्लब येथे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचे उद्घाटन केले. सुरक्षा दलाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.