
स्थैर्य, मुंबई, दि.६ : राज्यातील नदीच्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी वर्षा येथे बैठक संपन्न झाली त्यावेळी त्यांनी कडक भूमिका घेतली. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या व नियमित देखरेख ठेवणार असून दर महिन्याला अहवाल देणार आहेत.तसेच मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी वर्षा येथे बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी उपस्थित होते.