विश्वकोश निर्मिती कार्यात स्वायत्ततेचा अभाव

डॉ. राजा दीक्षित; ’तर्कतीर्थ आणि मराठी विश्वकोश’ यावर गुंफले पुष्प


दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या 34 वर्षांच्या काळात विश्वकोश निर्मिती कार्यात स्वायत्तता जतन करून त्या माध्यमातून तत्त्वज्ञान, व्यवस्थापन, प्रशासन, पद्धतीशास्त्र यांचा पाया रचला. मात्र, दुर्दैवाने आता ही स्वायत्तता राहिली नाही, अशी खंत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य व संस्कृती मंडळ, भाषा विभाग यांना पूर्ण स्वायत्तता असेल, तरच मराठी भाषेचा समृद्ध विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत ’तर्कतीर्थ आणि मराठी विश्वकोश’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अनिल जोशी होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, प्राचीन काळापासूनविविध कोशांची परंपरा आहे. 18 व्या शतकात इंग्लंड व फ्रान्समध्ये आधुनिक कोशाचा पाया रचला गेला. त्याद्वारे जागृती केल्याने फ्रेंच राज्यक्रांती उदयास आली. त्यामुळे कोशकार क्रांती घडवू शकतात, हेस्पष्ट होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जगातील संपूर्ण ज्ञान मातृभाषेत उपलब्ध करण्यासाठी साहित्य संस्कृतीमंडळाची स्थापना केली आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या माध्यमातून मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य हाती घेतले. त्यावेळी त्यांनी तर्कतीर्थ जोशी यांच्यापुढे राज्यसभेवर घेण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, तर्कतीर्थांनी भाषा समृद्धी करण्याचे काम हाती घेतले. त्यातून त्यांची ज्ञानाची भूक दिसते. प्राज्ञ पाठशाळेत स्वामी केवलानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मकोश निर्मितीचे धडे घेतले होते. त्यांनी 20 पैकी 15धर्मकोशांचे संपादन केले. त्यांच्यावर केसरी, चिपळूणकर, टिळक, आगरकर, महात्मा गांधी, तसेच कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता.

कार्ल मार्क्स विचाराला मर्यादा असल्याचे लक्षात आल्याने ते रॉय वादाकडे वळले. त्यांनीमानवतावादला लोकशाहीची जोड देऊन आपला वैश्विक विचार पुढे नेण्याचे काम केले. त्यांच्याकडे वैश्विक दृष्टी होती, त्यांना विश्व धर्मच अभिप्रेत होता. विश्वकोश अथवा ज्ञानकोशाचा अध्यक्ष संपादक हा विचारवंत आणि सर्वांगी तत्त्वज्ञ असावा लागतो. विश्वकोशाचे पहिले तीन अध्यक्ष तर्कतीर्थ जोशी, रा. ग. जाधव व मे. पू. रेगे हे आपले आदर्श आहेत. त्यांच्यासोबत काम केल्यानेच सव्वादोन वर्षे विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी कोरोना होता. तर्कतीर्थांच्या स्मृतिदिनाला अध्यक्ष झालो, हा विलक्षण योगायोग आहे. या काळात कुमार विश्वकोशाचे दोन खंड पूर्ण झाले. बाल विश्वकोश निर्मितीचे स्वप्न तर्कतीर्थ जोशी यांनी पाहिले होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली होती.

अनिल जोशी यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. विष्णू खरे यांनी प्रस्तावना केली. रवींद्र लटिंगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. माधव कान्हेरे व डॉ. अर्चना केळकर प्रायोजक होते. नागेश मोने यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!