उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? – चंद्रशेखर बावनकुळे


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करत नाहीत.

२०१९ मध्ये उद्धवजी यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली. परंतु उद्धवजी यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही; म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले.

आता उद्धवजी यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. ही नवी युती उद्धवजी सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धवजी यांची ही धडपड तर नाही ना? उद्धवजी यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धवजी उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही.


Back to top button
Don`t copy text!