
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे भारतीय अंगदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे समाजहिताच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण व प्रबोधनात्मक असे विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत भारतीय अंगदान जनजागृती कार्यक्रमाद्वारे मानवी अवयवदान, त्वचादान, देहदान, नेत्रदान, रक्तदान हे दान करणे सद्य:स्थितीत किती गरजेचे आहे, याचे महत्त्व लक्षात घेऊन व त्याचा प्रचार – प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, यादृष्टीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. योगेश गवळी, विभागप्रमुख, भूलशास्त्र विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, सातारा उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांना मार्गदर्शन करताना ‘अवयवदान’ आणि ‘देहदान’ असे या विषयाचे दोन भाग असून अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते. तर देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यूनंतर करता येते. अशावेळी देहदान करण्यासाठी मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान, त्वचादान होऊ शकते. जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते. म्हणजे दोन पैकी एक किडनी, यकृताचा काही भाग, फुफ्फुसाचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग, आतड्याचा काही भाग, गर्भाशय इ.
कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनीवर व्यवस्थितपणे व्यतित होऊ शकते. एका शरीरातून दुसर्या शरीरात एखादा अवयव प्रत्यारोपित केला जातो, त्यावेळी तो अवयव दोन्ही शरीरात ठराविक कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्णपणे कार्यरत होत असतो. त्यामुळे शरीराला कोणताही धोका संभवत नाही. जिवंतपणे वरील अवयवदान करून गरजू रुग्णांच्या आयुष्यात आनंद फुलविता येतो आणि त्याला कोणताही शारीरिक धोका उद्भवत नाही. मृत्यूनंतर म्हणजेच ‘ब्रेन डेड’ झाल्यानंतर त्या व्यक्तीला व्हेंटीलेटरवर ठेवले जाते. त्यावेळी विशिष्ट परीक्षणाद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करण्याचे थांबलेला आहे, हे निश्चित करता येते. त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात.
सुमारे ४० ते ५० अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवांची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अथवा अवयवांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. यामध्ये प्रामुख्याने दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, आतडी, डोळे तर कांही अवयव दुसर्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात. कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान यास संमती दिली तर, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो.
आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. सदर बाब इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. यातील कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी आपण केलेल्या संकल्पपूर्तीने आपण वाचवू शकतो. देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाईटवरती असे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकेल. ते संकल्प पत्र भरून आपण देहदानाचा संकल्प करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. अशी इत्यंभूत व महत्त्वपूर्ण माहिती डॉ. योगेश गवळी यांनी देऊन उपस्थित सर्वांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी आज भारतात अवयवदानाचे प्रमाण ०.१६ इतके आहे. त्यामुळे अवयवदान ही काळाची गरज आहे. याबाबत जरी एखाद्या दात्याने आपले नाव संबंधित यंत्रणेकडे नोंद केले असले तरी, त्याच्या मृत्यूपश्चात संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी जर या गोष्टीस नकार दर्शवला तरी याबाबत कोणतीही जबरदस्ती अगर सक्ती केली जात नाही. त्यामुळे सामाजिक संस्था त्याचबरोबर शासनाने सुद्धा योग्य ते सहकार्य करून हे जनजागृती अभियान जनताभिमुख होणेसाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. आर. बी. चव्हाण, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय सातारा, डॉ. संगीता गवळी, विभागप्रमुख, शरीरक्रिया शास्त्र विभाग, वैद्यकीय महाविद्यालय सातारा, डॉ. प्राजक्ता तायडे, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय महाविद्यालय सातारा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे व प्रा. महेश बिचुकले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वर्षा खराडे आणि आभार कु. अस्मिता माळी यांनी मानले.