![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/sanjeevraje_raid_at_phaltan_by_income_tax.jpg?resize=780%2C470&ssl=1)
आपण आजपर्यंत बऱ्याच वेळा आयकर विभागाची धाड पडल्याची बातमी ऐकतो. पण खरं पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आयकर विभागाची धाड पडते फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. रोज कुणाच्या तरी घरावर अथवा व्यवसायाच्या ठिकाणी धाड पडतच असते.
फलटण सारख्या आडवळणी गावामध्ये हे प्रकार तसे कमी पहावयास मिळतात. काही वर्षापूर्वी तसेच काही महिन्यांपूर्वी सुद्धा असे प्रकार घडले होते. परंतु याची वाच्यता झाली नव्हती. पण यावेळी मात्र फारच वाच्यता झाली असं म्हणावं लागेल.
यावेळी आयकर विभागाची धाड श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पडली. एक, दोन नव्हे तर तब्बल पाच दिवस सुरु असणारी चौकशी थांबली, नव्हे पूर्ण झाली.
या काळात कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याची तयारी केली. इतकंच नव्हे तर संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकर्ते श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानाजवळ तळ ठोकून होते. हे कशाचं द्योतक म्हणावे लागेल तर केवळ श्रीमंत संजीवराजे यांच्यावरील प्रेमापोटीच.
सत्ता असो वा नसो श्रीमंत संजीवराजे यांच्याबद्दलची निष्ठा तसुभरही कमी झालेली नाही. असंच म्हणावं लागेल.
या काळात कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा म्हणून श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत सत्यजितराजे, श्रीमंत विश्वजीतराजे यांनी मार्गदर्शन केले म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या बाबी सांगायचं कारण म्हणजे आयकर विभागाची धाड पडणे. कार्यकर्त्यांना आवाहन करावे लागणे ही बाब थोडी वेगळी वाटतेय नं. याचं कारण म्हणजे ही धाड राजघराण्यातील व्यक्तीवर पडली होती. ज्या राजघराण्याचा लौकिक तर सर्वांना परिचित आहे. ज्या राजघराण्याने संपूर्ण राज्याला वेगळा पायंडा घालून दिला आहे. फलटण संस्थान हे असं संस्थान आहे की राज्यातील प्रजेच्या हितासाठी आपले संस्थान विलीन केले होते.
या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे फलटणमधील जनतेचे इथल्या राजघराण्यावर आणि राजघराण्याचे जनतेवर असणारे प्रेम आढळून येते.