मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश


स्थैर्य, 25 मार्च, सातारा : मिशन वात्सल्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील विधवा आणि एकल महिलांना शासनाच्या विविध २४ योजनांचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. एकही पात्र महिला या योजनांपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी महिला व बाल विकास विभागाने घ्यावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मिशन वात्सल्य’ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ज्या महिलांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा जातीचे प्रमाणपत्र नाही, अशांसाठी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी (ग्रामीण) तहसीलदारांशी समन्वय साधून येत्या आठ दिवसांत विशेष कॅम्पचे आयोजन करावे. विधवा महिलांच्या वारस नोंदीसाठी लागणारे जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध करून देण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा करुन  कार्यवाही पूर्ण करावी.

ज्या महिलांना विमा पॉलिसीचा लाभ मिळालेला नाही, त्यांची यादी करून त्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने स्वतंत्र संकेतस्थळ  विकसित करावे.हे संकेतस्थळ परिपूर्ण असावे. तसेच एकल व विधवा महिलांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण द्यावे. मिशन वात्सल्य ही माझ्या जिव्हाळ्याची योजना आहे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. पुढील बैठकीत किती महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची लाभार्थीनिहाय माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!