स्थैर्य, दि.१२: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा सुरु करता येतील का याची चाचपणी सध्या सुरु आहे. मात्र “जर दिवाळीनंतरही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राहिला तर शाळा सुरु करणे शक्य नाही,” असे मत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
कोरोनाची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय सुरु करु नका, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यावर अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
“शाळा सुरु करण्याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. कपिल पाटील यांनी त्यांचा विचार मांडला असेल. आपण सर्वांच्या पत्राचा तसेच इतर मागण्यांचा चौफेर विचार करु, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान कदाचित आता पेक्षा कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि आपल्याला वाटले शाळा सुरु करण्यास हरकत नाही तेव्हा शाळा सुरू करता येतील, परंतु आपण जगाचा विचार केला तर ब्रिटनमध्ये 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले असल्याचे बच्चू यांनी यावेळी सांगितले.