
स्थैर्य, मुंबई, दि.१३: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड जुन्नर मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकर्यांचा बाळ हिरडा माल तात्काळ खरेदी करण्यात यावा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी पावरा म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड जुन्नर मावळ या आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत या हिरडीच्या झाडापासून हिरडा हे औषधी फळाचे उत्पादन मिळते. हिरडा हा माल हिरडा या झाडावरून दोन प्रकारात घेण्यात येते. 1) बाळहिरडा हा माल एप्रिल मे महिन्यात झाडावरून गोळा केला जातो तो कडक उन्हात वाळवून सुका करून त्यांची विक्री केली जाते. 2) मोठा हिरडा हा माल झाडावर परिपक्व झालेला असतो त्याला बी आलेली असते हा माल झाडावरून आँक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात झाडावरून गोळा केला जातो. आदिवासी शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा माल खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, आदिवासी विकास महामंंडळ आदिवासी शेतकर्यांकडून गेल्या चार वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्याचा बाळ हिरडा माल खरेदी करत नाही. हा संपूर्ण माल आदिवासी विकास महामंंडळानी खरेदी न केल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याचे फार मोठा प्रमाणात नुकसान होते. आदिवासी शेतकऱ्यांची बाळ हिरडा मालाची खरेदी सुरु करावी म्हणून आम्ही संबंधित आदिवासी विकास महामंंडळ मुख्य कार्यालय नाशिक यांच्याकडे नऊ महिन्यांपूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती. आता सध्या मे महिन्यात बाळहिरड्याची झाडावरून काढणी सुरू आहे विक्री शेतकऱ्यांनी चालू केली आहे. परंतु, शेतकऱ्यांचा माल आदिवासी विकास महामंंडळ व खाजगी व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे शेतकर्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक वेळा आदिवासी विकास महामंंडळाकडे प्रत्यक्ष भेटूनही व लेखी मागणी करूनही महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही व हिरडा खरेदी सुरू केली नाही. आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन पाटील हे कुठल्याही प्रकारच्या आदिवासी शेतकऱ्याचे हित होईल असे कामकाज करत नाही, असा आरोप बिरसा क्रांती दलाने केला.
आदिवासी विकास महामंडळाच्या विकासाच्या योजना बंद केल्या आहेत. आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतकर्यांच्या विकासाच्या योजना उदा. वरई, सावा, भात, नाचणी सर्व प्रकरणाची धान्य खरेदी बंद आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात तोटा होत असून अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने निष्क्रिय अधिकारी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन पाटील यांची या पदावरून तसेच या ठिकाणाहून त्वरित तातडीने बदली करण्यात यावी. व त्यांच्या जागी कार्यक्षम आधिकारी नेमून आदिवासी शेतकर्यांच्या बाळहिरडा या मालाची तातडीने खरेदी सुरु करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाला देण्यात यावेत. अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी शासनाकडे केली आहे. तसेच सदरहू निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री तथा पालकमंत्री पुणे दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी व आदिवासी विकास विभाग मंत्रालय प्रधान सचिव यांच्या कडे देखील पाठविण्यात आले असल्याची माहिती पावरा यांनी दिली.