
स्थैर्य, फलटण, दि. ३ सप्टेंबर : राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा देत, राज्य शासनाने अटल सेतू, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यातील पर्यावरणपूरक वाहतुकीला आणि स्वच्छ ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
खालील वाहनांना टोलमधून सूट:
- इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील)
- सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक बसेस – शासकीय (एसटी) तसेच खासगी.
मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.