
एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्याला कळले.त्याने कर्ज काढून देऊळ चांगले सजवले, रंगवले.
राजा पूजेला आला. आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्याला तिथेच घाम फुटला. आपण कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली. आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच. पुजारी हुशार होता. राजा गेल्यावर पुजार्याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला, “राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा.” आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का… ? पहिलीच बोली दहा हजार पासून… सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच ‘नाही परवडत’ असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.
तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, “महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय.
राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, “हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको.” तेव्हा पासून झाकली मूठ सव्वालाखाची याचा अर्थ झालेला प्रकार दोघांनाच ज्ञात असतो.बाकीची जनता अज्ञात असून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ करीत असते.झाकली लाखाची याचा मतितार्थ घरातल्या घरातच मिटवणे,चाराचौघांत डंका न पिटणे,नात्यात,कुटुंबात झालेला वादविवाद आपआपसांत मिटवून सावरुन घेणे.चला तर कलह,मतभेद,वैचारिक वाद समापोचाराने सोडविणे.वाच्यात न करणे.
झाकले माणिक गुण अनेक
आपलाच पूजक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१