पाचट न जाणाऱ्या शेतकऱ्यांचा होणार गौरव; ‘पर्यावरण संवर्धन शेती मित्र’ प्रमाण पत्राने होणार सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । पर्यावरणाचा ऱ्हास मानवाच्या मुळावर येऊ लागला आहे. बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन अनेक संकटांना निमंत्रण देत आहे.मनुष्यप्राण्याने हव्यासापोटी पर्यावरणाचे अतोनात नुकसान केलेले आहे. अधिकाधिक अन्न उत्पादन करण्याच्या नादात जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. रसायन विरहित पारंपरिक शेतीतून तयार होणारे अन्नच भावी पिढीचे रक्षण करू शकते. पर्यावरण संवर्धन हे एक व्रत एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजरीत्या हस्तांतरित झाले पाहिजे.मुळात अन्न हेच औषध ही आपली भारतीयांची मूळ संकल्पना आहे हे विसरून चालणार नाही. या ज्वलंत प्रश्नावर विधायक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या माणदेश विकास फाउंडेशन माण, सातारा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या व मंडळाच्या वतीने उसाचे पाचट न जाणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन शेती मित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उद्धव बाबर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांनी दिली.

उद्धव बाबर व लिंबाजी भड यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की माणदेश विकास फाऊंडेशन माण-सातारा ही संस्था पर्यावरण संरक्षणासाठी व संवर्धनासाठी काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून उसाची पाचट न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना गौरवण्याचा निर्णय संस्थेने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खोडवा ऊसाचा पाला न जाळता एक आडसरीमध्ये तसाच ठेवावा किंवा पाचट कुट्टी करावी. त्यामुळे त्याचे मोठे फायदे आहेत त्यामुळे हेक्‍टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याचे व सुमारे शंभर ते दीडशे युनिट विजेची बचत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात 50 टक्के याची बचत होत असल्याची उद्धव बाबर यांनी सांगितले व शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी ऊसाची वाढ चांगली होते. तसेच ऊस क्षेत्रातून एकरी पाच ते सहा टन पाचट मिळते. त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत कोणतीही वाहतूक न करता विना खर्चात खोडवा पिकाला शेतातच मिळते.

ऊसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाची वाढ होते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठ भागावरून होणाऱ्या बाष्पीभवन वेग कमी होतो. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्न द्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो, पाला 75 ते 100 किलो, उसाला उपलब्ध होते. जमिनीचे तापमान थंड राखले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. शेतात गांडुळांची नैसर्गिक रित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.तसेच पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते. पाचट कुजत असताना यातून पिकाला आवश्‍यक असणारा कार्बन-डायऑक्‍साईड वायू बाहेर पडतो. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, वैशाखी मूग, उडीद किंवा चवळी ची पिके घेतल्यास अतिरिक्त उत्पन्नाबरोबर जमिनीची सुपीकता सुधारते. पाचट न जाळल्यामुळे महत्त्वाचे फायदे होत असून पर्यावरण रक्षणाला फार मोठा हातभार लागत आहे.

त्यामुळे मानदेश विकास फाऊंडेशन माण- सातारा च्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या वतीने पाचट न जाणाऱ्या व शेतातच पाचट कुट्टी करून खत निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन शेती मित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतातील पाचट न जाळल्याचे फोटो,शेतकऱ्याचे नाव, गाव,पूर्ण पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी संस्थेकडे पाठवावा.

 संपर्क नंबर:- उद्धव बाबर- मोबा:-9823060560, 9423060560


Back to top button
Don`t copy text!