
स्थैर्य, सातारा, दि. 20 डिसेंबर – ज्येष्ठ नेत्या, माजी महसूल मंत्री व कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांचे शनिवारी (दि. 20) रोजी मुंबई येथे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात एक कणखर, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जनहिताचे अनेक निर्णय घेतले. महसूल मंत्री म्हणून त्यांनी प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता आणण्यावर भर दिला. डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगाव येथे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मोठ्या संघर्षातून कारखान्याची स्थापना केली. तसेच कोरेगाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ, स्पष्ट भूमिका आणि निर्भीड निर्णयक्षमतेमुळे त्या सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होत्या.
त्यांच्या निधनामुळे राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. कुटुंबीय, समर्थक, कार्यकर्ते आणि असंख्य चाहत्यांवर या दुःखद घटनेने शोककळा पसरली आहे. रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सातारा रोड तालुका कोरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
