रक्तदान करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन


स्थैर्य, बुलडाणा, दि.०४: रक्तदान शिबिरे प्रामुख्याने कॉलेजेस, आयटी व अन्य उद्योग क्षेत्रामध्ये घेऊन रक्त जमा केले जात असते. परंतु आता बहुतांश कॉलेजेस बंद असल्याने व बऱ्याचशा सेवा क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम पद्धतीनुसार काम सुरू असल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

राज्यात सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढी, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेते यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. जनतेनेही रक्तदानासाठी पुढे यावे व रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. लोकांनी सरकारच्या आवाहनाला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निश्चितच जनता रक्तदानासाठी पुढे येवून रक्तदान करणार आहे. जनतेच्या प्रतिसादामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही. तरी नागरिकांनी रक्तदान करावे व इतरांचे जीवन सुंदर बनवावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!