शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा

अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने  यांचे निर्देश


 स्थैर्य, 23 मार्च, सातारा : कृषी विभागाने शेतकऱ्यांना लाभ देताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे सर्व तालुक्यांमध्ये समान पद्धतीने पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही पात्र शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनेक शेतांमध्ये विद्युत तारा जमिनीलगत किंवा खूप खाली आल्या आहेत. यामुळे जीवितहानी किंवा मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. महावितरणने तातडीने या तारा उंच करण्याचे काम हाती घ्यावे. शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी.   गोडोली ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

या बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी विविध समस्या मांडल्या यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!