कास पठारावर पावसामुळे तुरळक ठिकाणी फुले

मुख्य हंगाम हा पंधरा ऑगस्टनंतरच सुरू


दैनिक स्थैर्य । 2 जून 2025। सातारा । जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेल्या कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना काही कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने या ठिकाणी सातार्‍याची ओळख सांगणार्‍या सातारेन्सिस फूल अगदी तुरळक ठिकाणी दिसत असले, तरी यंदाचा बहरलेला फुलोत्सव हंगाम ऑगस्टमध्ये पाहायला मिळेल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कारण, मुसळधार पावसानंतर श्रावणाच्या ऊन पावसाच्या खेळात येथील जीवसृष्टी खर्‍या अर्थाने बहरते. फुलांचे गालिचे या वेळीच बहरतात. त्यामुळे आता पठारावर फुले बघण्यासाठी येणाआगामी हंगाम हा पंधरा ऑगस्टनंतरच सुरूर्‍यांनी याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, फुले येणार्‍या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तंगुसाची जाळी बसविण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. आगामी हंगामाच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या जाळी बसवण्यात येत असली, तरी कास पठारावर फुले बहरण्यास अवकाश असून, होत असतो. त्यामुळे आता फुले पाहण्यास येणार्‍यांची निराशा होऊ शकते, असेही कास कार्यकारी समितीच्या सदस्यांनी सांगितले.

कास पठार विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या महिन्याच्या शेवटालाझालेल्या पावसामुळे कास पठार हिरवेगार झाले असून काही प्रदेशनिष्ठ फुलांचे तुरळक दर्शन होऊ लागले आहे. जून, जुलै महिन्यात सातारेन्सिस या खास सातार्‍याची ओळख सांगणार्‍या फुलाचे दर्शन पठारावर होते. त्यानंतर रानहळद (चवर) पठारावर मोठ्या प्रमाणात येते; परंतु पठारावर फुलांच्या गालीचांची खर्‍या अर्थाने उधळण होते ती सप्टेंबरमध्येच. यावेळी गेंद, तेरडा, सोनकी, मिकी माऊस या फुलांनी पठार बहरून जाते.

कास पठाराचे व्यवस्थापन कास पठार कार्यकारी समिती वनविभागाच्यामार्गदर्शनाखाली करते. कास, एकीव, पाटेघर, आटाळी, कुसुंबी, कासाणी या सहा गावांचा सहभाग असलेली समिती पठारावरील फुले व आजूबाजूच्या निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम करते. या दृष्टीनेच सद्यःस्थितीत कास पठाराला तंगुसाची जाळी बसवण्याचे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल.कास पठाराला सुरुवातीला लोखंडी जाळीचे कुंपण होते. या लोखंडी जाळीमुळे प्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होतात, तसेच पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होत आहे असल्याचे तज्ज्ञांचे मत आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पुढाकाराने ही जाळी काढून टाकण्यात आली. त्यानंतर पर्यटकांच्या गर्दीपासून फुलांचे संरक्षण करण्यासाठी हंगाम कालावधी पुरती तंगुसाची जाळी बसविण्यास सुरुवात केली. हंगामानंतर ही जाळी काढून टाकण्यात येते. त्यामुळे येथील नैसर्गिक परिसंस्था अबाधित राखण्याचे काम केले जाते.

अवकाळी पाऊस व मॉन्सूनच्या आगमनाने पठारावर धुके, खळाळून वाहणारे झरे, हिरवेगार पठार पाहावयास गेल्या काही दिवसांत लोकांची गर्दी होत आहे; पण समितीमार्फत पठाराचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या बाबी केल्या जात आहेत. आगामी हंगामाला अजून अवकाश असून, समिती पर्यटकांना सोयीसुविधा देण्यासाठी आवश्यक ती तयारी करत आहे.
– प्रदीप कदम, उपाध्यक्ष, कास कार्यकारी समिती.

वैशिष्ट्यपूर्ण कास पठार

  • कास पठार हे जैवविविधतेचे माहेरघर.
  • कातळ खडकाळ पठाराच्या पृष्ठभागावर मातीचे थर कमी.
  • समुद्रसपाटीपासून 1250 मीटर उंचीवर.
  • अंदाजे दहा चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ.
  • पठारावर 280 फुलांच्या प्रजाती.
  • वनस्पती, झुडपे आणि इतर 850 प्रजाती.
  • सरपटणार्‍या 59 जातीच्या प्राण्यांची नोंद.
  • अलीकडच्या काळात अवैध बांधकामांचा प्रश्न.
  • लोखंडी जाळी काढल्याने तंगुसाची जाळी.


Back to top button
Don`t copy text!