अण्णांच्या गावचा ‘सरपंच’ होण्यासाठी चढाओढ, यादवबाबांच्या जोडीला पोहोचले श्यामबाबांचे आशीर्वाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, राळेगणसिद्धी, दि.९: “अनशन’ या एका शब्दाने देशाचे तख्त हलविणाऱ्या अण्णा हजारेंच्या तत्त्वांची त्यांच्या राळेगाव सिद्धीत कसोटी लागली आहे. गावात तंटे नको या भूमिकेतून सुरू झालेल्या अ-विरोध परंपरेला गेल्या दोन निवडणुकींपासून फाटा दिलेल्या राळेगावमध्ये यंदा मापारी आणि औटी एकत्र आले खरे, पण तिसरा पर्याय का नको, असा प्रश्न उपस्थित करीत पठारेंनी त्यांना आव्हान दिले आहे. यादवबाबांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या रणधुमाळीत राजस्थानच्या श्यामबाबांचे आशीर्वाद पोहोचले आहेत.

गावातील पद्मावती मंदिराच्या परिसरातील लाइव्ह शोची सुरुवात जयसिंगराव मापारींच्या प्रतिक्रियेने झाली. त्रेपन्न वर्षांचे जयसिंगराव मापारी राळेगणचे तीन वेळा उपसरपंंच आणि एकदा सरपंच झाले होते. गेल्या वेळी त्यांच्याविरोधात लढलेले लाभेश औटी यावेळी मापारींसोबत आहेत. दोघांनी अण्णांचा आशीर्वाद घेऊन राळेगण सिद्धीत अ-विरोध निवडणुकीची घोषणा केली खरी पण किसनराव पठारेंनी “तिसरा पर्याय का नको?’ असा प्रश्न उपस्थित करीत त्यात खोडा घातला. शेवटी दोन जागांवर अविरोध निवड झाली आहे तर सात जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. “अण्णांच्या गावचे सरपंच बनणे असे प्रत्येकालाच वाटते’, जयसिंगराव सांगत होते. गेल्यावेळी त्यांच्या विरोधात लढलेले लाभेश औटी गावचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी उभारलेला सोलर प्रकल्प, राज्यातील पहिला पुनर्भरण प्रकल्प या झालेल्या विकासकामांची माहिती देत होते. सेंद्रिय शेतीउद्योगातील अग्रणी गाव म्हणून राळेगणचे भविष्य घडविण्याचे स्वप्न मांडत होते. त्यांच्याविरोधात उमेदवारी करणारे किसनराव पठारे मात्र त्या चर्चेत सहभागी झाले नव्हते. गावाच्या वेशीतून किसनरावांची गाडी वळली तेव्हा कुणीतरी “भावी सरपंच’ म्हणून त्यांची गंमतही केली. निवडणुकीसाठी गावात दोन गट झाले असले तरी निवडणूक काळात आणि नंतरही गावातील एकोपा टिकवून ठेवण्याचे आव्हान असल्याचे शरद मापारी सांगत होते. त्यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

जय श्री श्यामबाबांचा आशीर्वाद!
राळेगणचे यादवबाबा मंदिर हे अण्णा हजारेंसह संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान. यादवबाबांच्या मंदिरातच मुक्काम करणाऱ्या अण्णांनी आयुष्यभर यादवबाबांचे दर्शन घेऊन आंदोलने केली, उपोषणे केली. या वेळी निवडणुकीत उतरलेेल्या किसन पठारे यांनी थेट राजस्थानहून श्री श्यामबाबांची प्रतिमा मागवली आहे. आपल्या पॅनललाही त्यांनी श्यामबाबांचे नाव दिले आहे. अण्णांच्याच आशीर्वादाने आपणही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनीही सांगितले.

महिलांची पंचायत आणि पुरुषांचा कारभार
पंचायतराज व्यवस्थेने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले तरी सार्वजनिक-राजकीय अवकाशात ५० टक्के वाटा मिळविण्याचा महिलांचा संघर्ष आजही घराघरात सुरू आहे. “अण्णांचे गाव’ही यास अपवाद नाही. गेल्या वेळी सर्व जागांवर महिलांना उभे करून राळेगणने संपूर्ण “महिला पंचायती’चा विक्रम नोंदवला, पण अन्य गावांप्रमाणेच प्रत्यक्ष राजकारण आणि कामकाज पुरुषांच्याच हातात असल्याचे दिसले.
निवडणुकीसाठी चाललेल्या टीव्ही शोमध्ये अनेक ग्रामस्थ हिरिरीने बोलत होते, त्यात महिला मात्र एकही नव्हती!

…पण आता निवडणुकीत पथ्ये पाळावीत
सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती, आमच्या आमदारांनीही तसे आवाहन केले होते. त्यामुळे मतभेद होत नाहीत, भांडणतंटे होत नाहीत. माझी पहिली पसंती ग्रामसभेने सदस्य निवडावेत याला आहे. ते न झाल्यास, निवडणूक झालीच तर तेथेे दंगा, दारू, जेवणावळी, भांडणे होऊ नयेत, आमिष नसावे अशी माझी इच्छा आहे, त्याप्रमाणे ही निवडणूक होईल असे मला ग्रामस्थांनी आश्वासन दिले आहे. – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक


Back to top button
Don`t copy text!