कृषि विभागाच्या योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : सुभाष भांबुरे


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, फलटण व फरांदवाडी कृषीक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि; यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत तृणधान्य विकास कार्यक्रमावेळी शेतकर्‍यांना ज्वारी बियाणे वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी 25 एकराचे ज्वारी बियाणे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना फरांदवाडी येथील कृषी सहाय्यक सौ. ए. एस. बोराटे यांनी ज्वारी पेरणीपूर्वी करावयाची बीज प्रक्रियेबाबत माहिती दिली. तसेच सलग फळबाग लागवड व बांधावरील फळबाग लागवड करण्यास इच्छुक शेतकर्‍यांनी संपर्क करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत, मार्गदर्शक राजेंद्र राऊत, विकास फरांदे, विठ्ठल हिंगणे, संचालक कपिल राऊत, व्यवस्थापक विजय राऊत, सभासद शेतकरी दत्तात्रय नाळे, दिलीप दळवे, संदीप घनवट, पोपट बोराटे, राजेंद्र फरांदे हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय राऊत यांनी केले. आभार कपिल राऊत यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!